नाशिक: नाशिकच्या कळवण तालुक्यातील कन्हेरवाडी परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. आठ वर्षांचे प्रेमसंबंध आणि लग्नाच्या बंधनात अडकल्यानंतर काही तासांतच एका २५ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सचिन मोतीराम चौरे (रा. नरूळ) असे या मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणात तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन आणि आठंबे येथील तरुणीचे गेल्या ८ वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होते. दोघांच्या लग्नाला मुलीच्या घरच्यांचा तीव्र विरोध होता, तरीही तरुणीच्या आग्रहाखातर आणि हट्टामुळे अखेर तिच्या कुटुंबीयांनी संमती दर्शवली होती. लग्नानंतर या नवदाम्पत्याला कन्हेरवाडी येथील नातेवाईकांकडे ठेवण्यात आले होते. परंतु, सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास मुलीचे दोन भाऊ आणि मेव्हण्याने अचानक तिथे धडक दिली. त्यांनी सचिनवर धारदार शस्त्राने भीषण हल्ला केला. छातीवर झालेल्या गंभीर वारामुळे सचिनचा जागीच मृत्यू झाला.

या क्रूर कृत्यानंतर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच स्थानिक गावकरी धावून आले आणि त्यांनी तिघांनाही पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, कळवण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता, मृत सचिनच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली. आरोपींना मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून जमावाला शांत केले आणि आरोपींना कडक पोलीस बंदोबस्तात ठाण्यात नेले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.







