पुणे : राज्यात महायुती सरकार सत्तेत आणण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. या योजनेसाठी आदिवासी विभागाचा निधी वळवण्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार केला जात आहे.यावरून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा हा आरोप फेटाळला आहे. लाडक्या बहिणीसाठी निधी वळल्याचा आरोप अतिशय चुकीचा आणि खोटा आहे.. कोणत्याही खात्याचा निधी वळवला नाही, कुठलाही पैसा पळवला नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लाडक्या बहिणीसाठी पुन्हा एकदा आदिवासी विभागाचा 335 कोटी 70 लाखांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. यावरून लाडक्या बहिणीसाठी आदिवासी विभागाचा निधी वळवला असा आरोप विरोधकांकडून सरकारवर करण्यात येत आहे . मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे हे सर्व आरोप फेटाळले असून कुठलाही पैसा पळवलेला नाही, कुठलाही पैसा वळवलेला नाही, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

अर्थसंकल्पाची पद्धती ज्यांना कळत नाही, तेच अशाप्रकारे आरोप करतात. कारण, अर्थसंकल्पाच्या नियमानुसार वैयक्तिक लाभासाठी जो निधी दिला जातो, तो आदिवासी विभागातच दाखवावा लागेल, अनुसूचित जाती व सामाजिक न्याय विभागातच तो दाखवावा लागेल. यासंदर्भात अर्थमंत्री अजित पवार यांनीही सभागृहात खुलासा केला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.







