Crime News: छत्रपती संभाजीनगर: सिल्लोड तालुक्यातील बोदवड परिसरात एका शेतकऱ्याच्या अपहरणाची धक्कादायक घटना समोर आली असून, या घटनेमुळे संपूर्ण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. तुझ्या वडिलांचे अपहरण झाले आहे, आम्ही सांगू तिथे 1 कोटी रुपये घेऊन ये, असा थरकाप उडवणारा फोन येताच शेतकऱ्याच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. खंडणीसाठी हे अपहरण करण्यात आल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. Crime News

हेही वाचा- प्रशांत जगतापांनी राष्ट्रवादी का सोडली? रोहित पवारांकडे आहे ‘ते’ मोठं कारण, पण सांगायला नकार!
मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम माधवराव गव्हाणे हे बोदवड येथील शेतकरी आहेत. शनिवारी 27 डिसेंबर रोजी सायंकाळी ते उंडणगाव येथे एका व्यापाऱ्याकडून मका विक्रीचे पैसे घेण्यासाठी गेले होते. काही रक्कम घेतल्यानंतर रात्री सुमारे 8 वाजताच्या सुमारास ते आपल्या दुचाकीवरून घराकडे निघाले. मात्र उंडणगाव ते बोदवड या रस्त्यावर अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवून अपहरण केल्याचा संशय आहे. त्यानंतर ते घरी परतले नाहीत.
रात्री उशिरापर्यंत वडील घरी न परतल्याने त्यांच्या मुलाने शोधाशोध सुरू केली. नातेवाईक, ओळखीचे लोक आणि परिसरात चौकशी करूनही काही माहिती मिळाली नाही. अखेर अजिंठा पोलीस ठाण्यात तुकाराम गव्हाणे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. तक्रार नोंदवल्यानंतर काही वेळातच मध्यरात्री सुमारे 12 वाजता मुलाच्या मोबाईलवर एक फोन आला. हा कॉल तुकाराम गव्हाणे यांच्या मोबाईलवरूनच करण्यात आला होता.
‘त्या’ एका कॉलने खळबळ
कॉल करणाऱ्या व्यक्तीने थेट अपहरण केल्याची कबुली देत आम्ही सांगू त्या ठिकाणी 1 कोटी रुपये घेऊन ये, अशी खंडणीची मागणी केली. या फोन कॉलमुळे कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने तपासासाठी सक्रिय झाले.
अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली असून, तांत्रिक तपासाच्या माध्यमातून कॉलचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परिसरातील रस्ते, सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास केला जात आहे. मात्र रविवारी रात्री उशिरापर्यंत अपहृत शेतकरी किंवा संशयितांविषयी ठोस माहिती मिळालेली नव्हती. या घटनेमुळे शेतकरी वर्गात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.






