जालना : जालना जिल्ह्यात कामगारांसाठीच्या साहित्य वाटप योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले असून, या प्रकरणात तत्कालीन जिल्हा कामगार अधिकारी तथा विद्यमान जिल्हा कामगार उपायुक्त अमोल जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, याच प्रकरणातील गैरव्यवहाराची तक्रार स्वतः अमोल जाधव यांनी केली होती. मात्र, तपासादरम्यान त्यांच्यावरच संशयाची सुई फिरल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

जालना जिल्ह्यात बांधकाम कामगारांसाठी संसारोपयोगी साहित्याच्या किटचे वाटप करण्यात येत होते. मात्र, लाभार्थी कामगारांना किट देण्याऐवजी त्यातील साहित्य परस्पर खासगी व्यक्तींना विकण्यात आल्याचा आरोप आहे. जवळपास १०० ट्रक साहित्याचा अशा प्रकारे गैरव्यवहार झाल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी परतूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे, योजनेतील साहित्य वाटपात गैरप्रकार झाल्याची तक्रार अमोल जाधव यांनीच पोलिसांकडे केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता या प्रकरणात जाधव यांचीही भूमिका असल्याचे समोर आल्याने त्यांना अटक करण्यात आली.

परतूर, यदलापूर आणि वाटूर परिसरातून पोलिसांनी आतापर्यंत १ कोटी ७९ लाख ११ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. साहित्य नेमके कोणाला विकण्यात आले, या व्यवहारातून कोणाला आर्थिक फायदा झाला आणि या गैरव्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत किंवा स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. लाभार्थ्यांच्या याद्या, साहित्य वितरणाच्या नोंदी, गोदामातील उपलब्ध साठा आणि संबंधित कागदपत्रांची सखोल तपासणी करावी, अशी मागणी भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे. फिर्यादीच आरोपी झाल्याने या प्रकरणाची व्याप्ती आणि तपासाची दिशा आता महत्त्वाची ठरणार आहे.






