रायगड: रायगडच्या आंबेनळी घाटातील दाभिळ टोक परिसरात झालेल्या भीषण अपघातात स्कॉर्पिओ कार तब्बल 1200 फूट खोल दरीत कोसळून 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र या अपघाताबाबत समोर आलेली धक्कादायक बाब म्हणजे हा अपघात घडल्यानंतर जवळपास 24 तास कोणालाच त्याची माहिती नव्हती. रात्रीच्या अंधारात गाडी दरीत कोसळल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. अखेर तरुण घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. (Raigad Accident Ambenali Ghat)

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील काही तरुण मित्रांसह हर्णे येथे फिरण्यासाठी गेले होते. शनिवारी रात्री ते जेवण करून साताऱ्याकडे परत निघाले. मात्र रविवारी सकाळपर्यंत ते घरी न पोहोचल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. वारंवार फोन करूनही प्रतिसाद न मिळाल्याने नातेवाईकांनी पोलिसांशी संपर्क साधत शोधमोहीम सुरू केली.
पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास सुरू केला असता, तरुणांचे शेवटचे लोकेशन पोलादपूर आणि आंबेनळी घाट परिसरात आढळले. त्यानंतर दरीत शोधमोहीम राबवण्यात आली. सुरुवातीला एका जुन्या अपघातातील वाहन दिसल्याने गोंधळ उडाला. मात्र पुढील तपासणीत खोल दरीत स्कॉर्पिओ कार कोसळल्याचे स्पष्ट झाले.
अपघात इतका भीषण होता की कारमधील सर्व 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. रात्री अंधार आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे मृतदेह बाहेर काढणे शक्य झाले नाही. सोमवारी सकाळी ट्रेकर्स आणि बचाव पथकाने दोरी व स्ट्रेचरच्या सहाय्याने मृतदेह वर आणले.
या घटनेमुळे आंबेनळी घाटातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तसेच अपघातानंतर तब्बल 24 तास हा प्रकार लक्षात न आल्याने पोलिस आणि संबंधित यंत्रणांच्या प्रतिसादाबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.







