पुणे: राज्यात बालविवाहाच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. लवकरच लग्नपत्रिकेवर वर आणि वधू यांच्या नावासोबत त्यांची जन्मतारीख छापणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. राजस्थानमध्ये अशा प्रकारचा निर्णय घेतल्यानंतर आता महाराष्ट्रातही त्याच धर्तीवर नियम लागू करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बालविवाहाचे प्रमाण चिंताजनक असल्याची माहिती समोर आल्यानंतर सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे. विशेषतः मुलींच्या अल्पवयात होणाऱ्या विवाहामुळे त्यांच्या शिक्षणावर, आरोग्यावर आणि भवितव्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे सरकारने मान्य केले आहे.

विधानसभेत सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यात सर्वाधिक 48 टक्के मुलींचे विवाह 18 वर्षांपूर्वी झाल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर बीडमध्ये 43.7 टक्के, धुळे जिल्ह्यात 40.5 टक्के आणि सोलापूरमध्ये 40.3 टक्के मुलींचे अल्पवयात लग्न झाल्याची नोंद आहे. ही आकडेवारी चिंताजनक मानली जात आहे.
बालविवाह हा कायद्याने गुन्हा असतानाही अनेक भागांत अशा घटना घडत असल्यामुळे अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर लग्नपत्रिकेवर वर-वधूची जन्मतारीख नमूद करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. यामुळे विवाहाच्या वेळी दोघांचे वय सहज तपासता येईल आणि अल्पवयीन मुला-मुलींचे विवाह रोखण्यास मदत होईल, असा सरकारचा विश्वास आहे.
दरम्यान, बालविवाह रोखण्यासाठी राज्यात जनजागृती मोहीम, कायदेशीर कारवाई आणि विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. आता या नव्या प्रस्तावामुळे बालविवाहाविरोधातील मोहिमेला आणखी बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






