मावळ (पुणे): मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. रविवारी दुपारी घडलेल्या या दुर्घटनेत चार निष्पाप पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले, तर ५१ जण जखमी झाले आहेत. या थरारक घटनेत खराडी येथील योगेश आणि शिल्पा भंडारे या पती-पत्नीचा जीव थोडक्यात बचावला आहे.

योगेश भंडारे हे रविवारी त्यांच्या पत्नीसह कुंडमळा येथे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी गेले होते. दुर्दैवाने, त्याचवेळी पूल कोसळण्याची भीषण घटना घडली. सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेले योगेश यांनी दुर्घटनेवेळचा थरार माध्यमांना सांगितला. “मी माझ्या डोळ्यांनी मृत्यू पाहिला,” असे सांगताना त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. “पूल कोसळला तेव्हा आम्ही पुलाच्या बरोबर मध्यभागी होतो. ज्या तिघांचा मृत्यू झाला, तो क्षण माझ्या डोळ्यासमोरून जात नाहीये. लोकांनी ‘घाई करू नका, पुढे जाऊ नका’ असे सांगितले होते, पण कोणीही ऐकले नाही आणि हे सर्व घडले,” असे योगेश यांनी सांगितले.
दरम्यान, पूल कोसळल्यानंतर नदीपात्रात नेमके किती जण पडले होते, याबाबत प्रशासनाकडे अद्याप ठोस आकडेवारी नाही. रविवारी रात्रीपर्यंत बचावकार्य करून अनेकांना बाहेर काढले होते. मात्र, रात्री अंधारामुळे बचावकार्य थांबवण्यात आले होते. सोमवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरु करण्यात आले आहे. परंतु, काल झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याची पातळी आणि पाण्याचा वेग प्रचंड वाढला आहे. सद्यस्थितीत आणखी काही जण बेपत्ता असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.







