पुणे : मी नुकतीच राजकीय जीवनाला सुरुवात केली होती. त्यावेळी बॅरिस्टर ए आर अंतुले साहेबांचे मुख्यमंत्रीपद गेले होते. १९७९/८० चा काळ असेल. त्यावेळी पुण्याचे जिल्हाधिकारी अजित निंबाळकर होते. त्यावेळी देशात आणि राज्यात सिमेंटचे खूप मोठ्या प्रमाणावर शॉर्टजे होते. शॉर्टेज इतके होते की, अजिबात विचारायची सोयच नव्हती. त्यावेळी अजित निंबाळकर यांच्या हातामध्ये सिमेंट विकत घेण्याच परमिट देण्याचे अधिकार होते. त्यामुळे मी निंबाळकर साहेबांकडे गेलो आणि म्हणालो, काटेवाडीमध्ये घर बांधायला काढले आहे. त्यासाठी सिमेंट पाहिजे असल्याचे त्यांना सांगितले. त्यावेळी मी मनामध्ये ठरवलं होत बंगला बांधल्याशिवाय लग्न करायच नाही. बायकोला पत्र्याच्या घरात आणू काय ? कर्मधर्म संयोगाने मला सिमेंटच परमिट देण्यात आलं, त्यावेळी एक सीमेंटच पोत २७ रुपये ८५ पैशांना होत, मला एक हजार पोती दिली गेली आणि माझ घर बांधून झालं. तसेच ज्यावेळी मी घराकडे पाहतो, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर अजित निंबाळकर येत असतात, असे म्हणताच उपस्थितामध्ये जोरदार हशा पिकला.

मराठा, मराठा – कुणबी आणि कुणबी समाजाच्या उत्थानासाठी सुरू करण्यात आलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथीच्या माध्यमांतून युपीएससी, एमपीएससी आणि विविध स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते मार्गदर्शन करत होते.

त्यावेळी निवड झालेल्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतेवेळी अजित पवार म्हणाले की, ‘आता तुम्ही काही कालावधीतचं महत्वाच्या अशा अधिकारी पदावर काम करणार आहात, सगळ्यांनी व्यवस्थित जबाबदारीने काम पार पाडा, पण कधी चुकून आपलं काही चुकलं तर त्या ठिकाणी मोठी बदनामी आपल्याला सहन करावी लागते. त्या गोष्टी होता कामा नये, तसेच तुमच्याकडे येणाऱ्या नागरिकांचे प्रश्न तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवा सगळी लोक लांब गावातून तुमच्याकडे येतात कुणालाही काम न करता परत पाठवू नका, असा सल्ला देखील त्यांनी होऊ घातलेल्या नव्या अधिकाऱ्यांना दिला.







