पुणे: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Pune Politics) निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर (Ajit Pawar) राजकीय समीकरणं अतिशय (Supriya Sule) वेगाने बदलताना दिसत आहेत. 246 नगरपालिका आणि 18 नगरपंचायतींसाठी मतदानाची तारीख जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे आणि आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या हालचाली वाढल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

पिंपरी-चिंचवडमधील अजित पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी माध्यमांशी बोलताना “अजित दादा आणि सुप्रिया सुळे यांच्यात निवडणुकीपूर्वी चर्चा झाली आहे आणि दोन्ही एकत्र येऊन लढण्यासाठी सकारात्मक विचार करत आहेत. अजित दादा याबाबत काका शरद पवार यांच्याशी लवकरच अंतिम संवाद साधून योग्य तो निर्णय घेणार आहेत,” असं सांगितलं. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चाना अधिक बळ मिळालं आहे.
दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अजित पवारांच्या गटाशी टायमिंग साधत डाव टाकला असल्याचंही सूत्रांचं म्हणणं आहे. बीड, चंदगड आणि बार्शी येथे दोन्ही गट एकत्र येत असल्याचं चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे, चंदगड नगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही गटांना एकत्र आणण्यात मंत्री हसन मुश्रीफ यांनी मध्यस्थी केल्याची माहिती स्थानिक नेत्यांनी दिली. ‘भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं हाच आमचा अजेंडा आहे’ असं स्थानिक कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलं.
अजित पवारांनी शरद पवारांपासून बाजूला होत वेगळा गट तयार करून सत्तेत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादी ही दोन तुकड्यांत विभागली होती. त्यानंतर शरद पवारांना नवा पक्ष स्थापन करावा लागला होता. मात्र, या दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचालींमुळे पुन्हा एकदा “पवार घराण्यातील समझोता” या चर्चांना ऊत आला आहे.
दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येतात की स्वतंत्रपणे रणनिती आखतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. स्थानिक पातळीवर नेतेमंडळींच्या बैठका सुरू असून, पुढील काही दिवसांत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या नव्या राजकीय हालचालींनी निवडणुकीपूर्वीचा वातावरण अधिक तापलं असून, आगामी काही दिवस राज्याच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार असल्याचं निरीक्षकांचे म्हणणं आहे.







