रांजणगाव गणपती: वाघाळे ता.शिरुर येथील चासकमान (Shirur News) कालव्याच्या मोरी शेजारील वस्ती जवळ (Pune News) शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक केलेल्या हल्ल्यात आठ शेळ्या व एक मेंढी ठार झाल्यामुळे या वस्तीवरील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,येथील बाळू रमाजी थोरात यांच्या गोठ्यात शेळ्या व मेंढ्या बांधलेल्या होत्या,ते कामानिमित्त सकाळी ७ वाजता बाहेर गेले असता जाळीवरून बिबट्याने उडी मारून हल्ला करून गोठ्यातील सर्व शेळ्यांवर व एका मेंढीवर हल्ला चढवला, त्यावेळी मेंढपाळाने आरडाओरडा केल्याने शेजारील शेतकरी धावत येऊन बिबट्या पळून गेला, परंतू बिबटयाने केलेल्या हल्ल्यात आठ शेळया व एक मेंढी मृत्युमुखी पडली. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती असल्याने बिबटे लपून राहतात त्यामुळे शेतात काम करणारे शेतकरी व रस्त्याने ये-जा करणारे नागरिकांच्या सुरक्षितेबाबत भीतीचे वातावरण तयार झाले असून, बिबटयाने फडशा पडलेल्या शेळ्या व मेंढी यांचा वन विभागाने पंचनामा केला असून, तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करुन मेंढपाळास नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
नुकसानग्रस्त मेंढपाळास रांजणगाव गणपती येथील ज्योती मानसिंग पाचुंदकर यांच्या वतीने १५ हजार रुपये आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी वाघाळ्याच्या सरपंच अनिता गावडे, युवा उद्योजक ज्ञानेश्वर पाचुंदकर,ग्रामपंचायत सदस्य अनिल दुंडे,निलेश लांडे, माजी सरपंच नंदा शेळके, अमोल धरणे,विजय गावडे, रावसाहेब थोरात, विजय थोरात आदी ग्रामस्थ उपस्थित होते.







