Pune : भोर तालुक्यातील एका शेतकऱ्याने आधुनिक शेती तंत्रज्ञान, काटेकोर नियोजन आणि कुटुंबाच्या मेहनतीच्या जोरावर अवघ्या एक एकर क्षेत्रातून तब्बल ३० टन वांग्याचे उत्पादन घेत सुमारे १० लाख रुपयांचा नफा कमावल्याने परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. चार महिन्यांत मिळालेल्या या उत्पन्नामुळे शेती ही योग्य पद्धतीने केल्यास फायदेशीर ठरू शकते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

तीन वर्षांचा अनुभव, यंदाचा हंगाम ठरला ‘सुपरहिट’
भोर तालुक्यातील शेतकरी राजेंद्र महादेव सोनवणे हे गेल्या तीन वर्षांपासून काळ्या भरिती वांग्याची लागवड करत आहेत. मात्र यंदाचा हंगाम त्यांच्यासाठी सर्वाधिक लाभदायक ठरला. ऑक्टोबर ते जानेवारी या चार महिन्यांत त्यांनी १६ वेळा वांग्याची तोड घेतली असून आतापर्यंत सुमारे ३० टन उत्पादनाची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे झाडांवर अजूनही भरघोस फळधारणा सुरू असून मार्चपर्यंत तोड चालू राहण्याची शक्यता आहे.
दर्जेदार बियाण्यांची निवड ठरली निर्णायक
उत्पादन वाढीमागे सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे योग्य आणि दर्जेदार बियाण्यांची निवड. सोनवणे यांनी इंझा कंपनीच्या ‘बारटोक’ या काळ्या भरिती वांग्याच्या जातीची निवड केली. एक हजार बियाण्यांची एक मुडी साडेचार हजार रुपयांना खरेदी करण्यात आली. एकूण तीन हजार बियाणांसाठी सुमारे १५ हजार रुपयांचा खर्च झाला. नर्सरीमध्ये रोपे तयार करताना प्रति रोप साधारण १ रुपया २० पैसे खर्च आला.
शास्त्रोक्त लागवड, मलचिंगचा फायदा
लागवडीपूर्वी जमिनीची योग्य तयारी करण्यात आली. निंबोळी पेंड, वसाडोस आणि कोंबडी खताच्या सुमारे ५० बॅग्स वापरून बेड तयार करण्यात आले. ऑगस्ट महिन्यात मलचिंग पेपर टाकून पाच बाय तीन फूट अंतरावर रोपांची लागवड करण्यात आली. मलचिंगमुळे तण नियंत्रण, ओलावा टिकवणे आणि उत्पादन वाढ याचा थेट फायदा झाला. लागवडीनंतर अवघ्या दोन महिन्यांत पहिली तोड सुरू झाली.
पीक संरक्षणासाठी काटेकोर नियोजन
पीक निरोगी ठेवण्यासाठी औषध फवारणीचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरले. इकोला अॅग्रो कंपनीचे अर्जुन शिंदे यांनी फवारणीबाबत मार्गदर्शन केले, तर बियाणे कंपनीच्या तज्ज्ञांनी वेळोवेळी शेताला भेट देऊन पिकाची पाहणी केली. आतापर्यंत औषध फवारणीसाठी सुमारे १ लाख ९० हजार रुपयांचा खर्च झाला असला, तरी त्यातून उत्पादनात लक्षणीय वाढ झाली.
कुटुंबाचा आधार, मजुरांची मदत
शेतीची दैनंदिन देखभाल राजेंद्र सोनवणे हे पत्नी पूनम, आई-वडिलांच्या मदतीने करतात. पाणी व्यवस्थापन, खतांचे नियोजन आणि पिकाचे निरीक्षण हे सर्व कामे कुटुंब एकत्रितपणे करत असल्याने खर्चही नियंत्रणात राहतो. मात्र वांग्याची तोड मोठ्या प्रमाणावर असल्याने त्या काळात मजुरांची मदत घ्यावी लागते.
इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा
“शास्त्रोक्त पद्धतीने शेती, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि कुटुंबाची साथ यामुळेच हे यश मिळाले,” असे राजेंद्र सोनवणे सांगतात. कमी क्षेत्रात जास्त उत्पादन आणि चांगला नफा कसा मिळवता येतो, याचे हे उदाहरण भोर तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. पारंपरिक शेतीपलीकडे जाऊन आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारल्यास शेतीही आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यवसाय ठरू शकते, हा संदेश या यशोगाथेतून स्पष्टपणे पुढे येतो.







