गणेश सुळ

यवत: पारगाव ते यवत (Yavat News) रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे पुणे जिल्ह्यातील खुटबाव परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून या चौकात सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने हा या चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ज्यामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

सततच्या वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थी, कामगार, व्यापारी वर्ग तसेच सामान्य प्रवाशांना रोज प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शिरूर ते चौफुला आणि पुणे ते सोलापूर महामार्गांना जोडणारा हा एक महत्त्वाचा मार्ग असल्याने येथे दररोज हजारो वाहनांची मोठी वर्दळ असते. या वाढत्या वर्दळीत, चौकातील अपुरे आणि संथगतीने चाललेले रस्त्याचे काम अधिक भर घालत आहे. नागरिकांना 2 मिनिटांच्या प्रवासासाठी दीर्घकाळ धूळ खात ताटकळत उभे राहावे लागत आहे.

परिसरात मोठे महाविद्यालय आणि जिल्हा परिषद शाळा असल्यामुळे वाहतूक कोंडी आणि धुळीमुळे विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. पर्यायी मार्ग खोदून ठेवल्याने शेतीसाठी लागणारी खते, औषधे आणि मशागतीची यंत्रणा शेतात पोहोचत नाहीये, ज्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. पशुपालकांना देखील जनावरांसाठी लागणारा चारा लांबून डोक्यावर घेऊन यावा लागत आहे.
या वाहतूक कोंडीमुळे दररोज जवळपास 20 ते 25 वाहने रस्त्यात अडकून पडत असल्याचे चित्र आहे. हा त्रास थांबवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी आणि शेतकरी वर्गाने जोरदार मागणी केली आहे. या महामार्गाचे काम एकाच वेळी सर्वत्र न करता ते टप्प्याटप्प्याने करावे तसेच होणाऱ्या वाहतूक कोंडीसाठी ठोस उपाय योजना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.






