लोणी काळभोर, ता. 20 : मागील पंधरा दिवसांपासून वडगाव बांडे (ता. दौंड) (Vadgaon Bande Daund) येथील जिल्हा परिषद शाळेला दोन शिक्षक हजर झाले नाहीत. ग्रामस्थांनी याबाबत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शिक्षक अधिकारी व गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे शिक्षक त्वरित मिळावेत म्हणून निवेदनाद्वारे मागणी केली आहे. परंतु, शिक्षण विभाग शिक्षक उपलब्ध करून देण्यास अयशस्वी झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी बुधवारी (ता.19) शाळेला टाळे ठोकले आहेत (Daund News). विद्येच्या माहेरघरातच अशी अवस्था असेल तर येथील शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याचे दिसून येत आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या ऑक्टोबर महिन्यात ऑनलाइन पद्धतीने झाल्या. प्रतिनियुक्तीनुसार अनेक शिक्षक नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झाले आहेत. वडगाव बांडे येथील शाळेतील चार शिक्षकांची बदली झाली होती. या शाळेतील चार शिक्षक प्रतिनियुक्तीच्या ठिकाणी हजर झाले आहेत. परंतु, या शाळेत बदली होऊन आलेल्या चारपैकी दोनच शिक्षक रुजू झाले आहेत. परंतु, नियुक्ती झाल्यापासून दोन शिक्षक आलेच नसल्यामुळे त्या ठिकाणी प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे पवित्र काम करणाऱ्या शिक्षकांवर अतिरिक्त ताण पडत आहे. शिक्षक गैरहजर असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मात्र खेळखंडोबा होत आहे.
हेही वाचा: बिबट्याचा हल्ला थांबवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये…
वडगाव बांडे (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद शाळेत 220 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या शाळेत शिक्षक हजर न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत चालले होते. हे रोखण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन व शालेय व्यवस्थापन समितीने शाळेला शिक्षक त्वरित मिळावे. म्हणून पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शिक्षक अधिकारी व गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली. तसेच या मागण्यांचा पाठपुरवठा देखील केला. परंतु, काहीही केले तरी शाळेत शिक्षक येत नसल्याने, संतप्त ग्रामस्थांनी जोपर्यंत शिक्षक येत नाहीत अखेर तोपर्यंत शाळेला बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. दरवर्षी या ठिकाणी देशाच्या अनेक कोपऱ्यातून आणि परदेशातून विद्यार्थी शिक्षणासाठी मोठ्या संख्येने येत असतात. मात्र, येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकविणारे शिक्षक हे गैरहजर राहत असल्याचे दिसून येत आहे. तर काही शिक्षक हे वेगवेगळी कारणे दाखवून दांडी मारण्यातही माहीर आहेत. त्यामुळे विद्येच्या माहेरघरातच शाळेला ‘कोणी शिक्षक देता का शिक्षक’ अशी म्हणण्याची वेळ सध्या पालकांवर आली आहे.
जिल्ह्यात शिक्षणाचा विस्तार वाढला असून इंग्रजी माध्यम, केंद्रीय शिक्षण मंडळ आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळे ही ग्रामीण भागापर्यंत पोचले. शिक्षण हे केवळ विद्याज्ञानाच्या अनेक कक्षा रुंदावणारे असल्याने शिक्षणाची वाटचाल एका नव्या प्रगतीच्या वाटचालीवर आहे. ई-लर्निंग, डिजिटल अशी हायटेक शिक्षण प्रणाली विकसित होऊ लागली आहे. परंतु, शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या घटकातील मुलांची संख्याही संपलेली नाही. त्यामुळे शिक्षणाचा पाया मजबूत करून देशाचा डोलारा सांभाळणारी शिक्षण व्यवस्था निर्माण करणे हे पुढील शिक्षणाच्या वाटचालीचे प्रमुख आव्हान असणार आहे.
दरम्यान, याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी पुणे जिल्हा (प्राथमिक) शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी फोन न उचलल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.
शाळेतील शिक्षकांची बदली झाली. नवीन शिक्षक शाळेत येण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला केवळ शिक्षण विभाग जबाबदार आहे.
– प्रियांका मेमाणे (पालक)
शाळा बंदचा आज दुसरा दिवस
निवेदने दिली व त्यांचा पाठपुरावादेखील केला तरीही शाळेला शिक्षक मिळत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी बुधवारी (ता.19) शाळेला टाळे ठोकले आहे. तसेच गुरुवारी (ता.20) दुसऱ्या दिवशीही शाळा बंद ठेवली आहे. परंतु, विद्येचे माहेरघर म्हणून ओळखला जाणारा पुणे शिक्षण विभाग हा शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी असमर्थ ठरला आहे. शिक्षकांच्या या बेजबाबदार वर्तणुकीमुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात सापडले आहे. त्यामुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून या शाळेला शिक्षक कधी मिळेल? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.






