इम्रान आत्तार

भोर: सध्या मे महिना संपण्याच्या मार्गावर असून अजूनही कडक उन्हाळा , मोठे तापमान , प्रचंड उकाडा वाढला असून भोर तालुक्यातील धरणांनी भाटघर, निरा – देवघर धरणांमधून उन्हाळी आवर्तन सोडण्यात आल्याने धरणांनी तळ गाठला आहे. भाटघर धरणात १०.५३ टक्के तर निरा- देवघर धरणात २४.१२ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असून पाणीटंचाईचे संकट तीव्र होण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच शेतकरी वर्गाला ,नागरिकांना मान्सूनची प्रतीक्षा लागूनराहिली आहे. धरणाच्या पाण्यांनी तळ गाठल्याने भोर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात पाणी पुरवठा कमी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
धरणांतून गेल्या तीन महिन्यांपासून होत असल्याने सततच्या पाणी विसर्गामुळे धरणातील पाणी पातळी खालावली असून धरणाचे बुडीत क्षेत्र कोरडे पडू लागले आहे. २४ टीएमसी एवढी भाटघर धरणाची पाणी पातळी असुनही शहराला दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे
भोर शहराला भाटघर धरणातून वर्षभर पाणीपुरवठा केला जातो. सध्या धरण क्षेत्रातील पाणी पातळी घटून १० टक्के म्हणजे अत्यल्प पाणीसाठा उरला असल्याने शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. भोर शहरातील नागरिकांनी पाण्याचा अपव्यय न करता पाणी वापर करावा, असे आवाहन नगरपालिका पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
भाटघर धरणाची पाणी साठवण क्षमता २४ टिएमसी असून भोर, खंडाळा, पुरंदर, बारामती, इंदापूर, फलटण यासह सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमधील शेतीला आणि गावांना या धरणातून पाणीपुरवठा होतो. तर १२ टीएमसी असलेल्या निरा-देवघर धरणाचे पाणी भोर, खंडाळा, फलटण तालुक्यातील शेतीला व पिण्याच्या पाण्यासाठी उपयोगी ठरते.
यंदा पाऊस वेळेवर दाखल न झाल्यास धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या तालुक्यांमध्ये पाणी टंचाईचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरणांच्या पाणी पातळीत घट झाल्याने धरण क्षेत्रातील काही विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या गावांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे. यंदाच्या उर्वरित पाणीसाठ्यातून पाणीटंचाईचे संकट टाळण्यासाठी पुढील काळात योग्य नियोजन करून धरणात मुबलक पाणीसाठा ठेवण्याची मागणी तालुक्यातील ग्रामस्थांकडून होत आहे.







