इम्रान आत्तार

भोर: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अचूक व अद्ययावत करण्यासाठी मा. भारत निवडणूक आयोगाने ‘विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम २०२६’ सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत भोर विधानसभा मतदारसंघात अभिजीत मंगल कार्यालय, भोर येथे विशेष बैठक व प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीला मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी मार्गदर्शन केले. यावेळी १६ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, २४० मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) आणि २५ पर्यवेक्षक उपस्थित होते.
‘एक मतदार, एकच मतदान’ या तत्त्वावर भर
डॉ. विकास खरात यांनी यावेळी स्पष्ट केले की, मतदार यादीत एकही पात्र नागरिक सुटणार नाही आणि एकही नाव दुबार राहणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. मयत, कायमस्वरूपी स्थलांतरित किंवा दुबार नावांची खात्री करून कायदेशीर प्रक्रियेद्वारे अशी नावे मतदार यादीतून वगळण्याची (नमुना ७) कार्यवाही केली जाईल. त्यामुळे कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांची नावे स्थानिक मतदार यादीतून कमी होऊन यादी शुद्ध होण्यास मदत होणार आहे.
मतदारांसाठी ३० जूनपासून घरोघरी मोहीम
१) दि. ३०-०६-२०२६ ते २९-०७-२०२६ या कालावधीत बीएलओ प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन ENUMERATION FORM च्या २ प्रती वाटप करतील.
२)मतदारांनी सन २००२ व सन २०२६ च्या मतदार यादीतील आपली सर्व माहिती भरून फॉर्म बीएलओ यांच्याकडे द्यावेत.
३) सदरचे फॉर्म भरणे सर्व मतदारांना अनिवार्य आहे.
४) परगावी व स्थलांतरित मतदारांनीही आपल्या भागातील बीएलओ यांच्याकडून फॉर्म घेऊन भरावेत.
राजकीय पक्षांना सहभागाचे आवाहन
सर्व राजकीय पक्षांनी मतदान केंद्रनिहाय आपले बीएलए (Booth Level Agent) नेमून मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रमात सहभागी व्हावे व मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, असे आवाहन डॉ. खरात यांनी केले.
या बैठकीत बीएलओ यांना मास्टर ट्रेनर यांच्यामार्फत नवीन ॲप, ऑनलाईन फॉर्म्स आणि निवडणूक आयोगाच्या डिजिटल प्रणालीबाबत तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले. शेवटी उपस्थितांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
भोरला एकूण १ लाख ६७ हजार ८२२ मतदार असून जवळपास १ लाख ३३ हजार मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून ३४ हजाराहून अधिक मतदान मतदानापासून वंचित राहिले आहेत. सदर मतदारात मयत ,दुबार ,स्थलांतरित असे मतदार असल्याने शिल्लक राहिले आहे .या मोहीमेत मतदारांना ज्या ठिकाणी मतदानाचे नाव ठेवायचे आहे अशाच ठिकाणी यावेळी मतदानाचा बी एल ओ कडे फॉर्म भरून देणे अनिवार्य आहे .अन्यथा स्थलांतरित मतदार व दुबार मतदार मतदार हे पूर्णतः मतदार यादीतून वगळण्यात येणार असल्याचेही तहसीलदार राजेंद्र नजन यांनी स्पष्ट केले.







