अक्षय टेमगिरे

शिरूर, ता. ९ : शिरूर तालुक्यातील तीन महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांनी पदभार स्वीकारला असून, त्यांच्या आगमनामुळे तालुक्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत नव्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून विविध प्रकारच्या अवैध धंद्यांमुळे, वाढत्या गुन्हेगारीमुळे आणि सामाजिक प्रश्नांमुळे चर्चेत असलेल्या शिरूर तालुक्यात आता खऱ्या अर्थाने बदल घडणार का, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.
रांजणगाव गणपती पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी कुमार रामचंद्र कदम यांनी पदभार स्वीकारला आहे. तर विनोद भगवान पाटील यांनी शिरूर पोलीस ठाण्याची आणि चंद्रशेखर मोहनराव यादव यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्याची धुरा सांभाळली आहे. तीनही अधिकाऱ्यांसमोर आता गुन्हेगारी नियंत्रणासह जनतेचा विश्वास संपादन करण्याचे मोठे आव्हान उभे आहे.
शिरूर तालुक्यातील औद्योगिक क्षेत्र, पुणे-अहमदनगर महामार्गालगतचा परिसर आणि ग्रामीण भागात विविध प्रकारचे अवैध व्यवसाय सुरू असल्याबाबत स्थानिक पातळीवर सातत्याने चर्चा होत असते. अवैध दारू विक्री, मटका-जुगार, ऑनलाइन बेटिंग, अमली पदार्थांची विक्री, गुटखा तस्करी, डिझेल चोरी, औद्योगिक स्क्रॅप चोरी, तसेच मुरूम, माती आणि वाळूच्या अवैध उत्खननाबाबत वेळोवेळी तक्रारी समोर येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याशिवाय काही ठिकाणी लॉजिंगच्या आडून कथित गैरप्रकार सुरू असल्याची चर्चा असून, अशा प्रकारांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून वारंवार करण्यात येत आहे.
रोडरोमिओ, स्टंटबाजी आणि बिननंबरच्या वाहनांचा त्रास
शाळा व महाविद्यालय परिसरात रोडरोमिओंचा वाढता वावर, नंबर प्लेट नसलेली वाहने, काळी फिल्म लावून फिरणाऱ्या गाड्या, भरधाव वेगाने स्टंटबाजी करणारे युवक आणि रात्रीच्या वेळी होणाऱ्या संशयास्पद हालचाली यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. काही भागांत नशेच्या पदार्थांचे सेवन आणि विक्री वाढल्याचा आरोपही स्थानिकांकडून केला जात आहे. अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याच्या घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
महामार्गालगतचे लॉजिंग, रात्रीची अवैध वाहतूक आणि वाढती नाराजी
पुणे-अहमदनगर महामार्गालगत काही लॉजिंगवर कथित गैरप्रकार सुरू असल्याबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे. तसेच रात्रीच्या वेळी मुरूम, माती आणि इतर साहित्याची होणारी वाहतूक, संशयास्पद वाहने आणि काही ठिकाणी सुरू असलेल्या अवैध व्यवहारांमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
नव्या अधिकाऱ्यांसमोर विश्वास पुनर्स्थापित करण्याचे आव्हान
पोलीस दलात बदल झाल्यानंतर नागरिकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. अवैध धंद्यांवर कठोर कारवाई, गुन्हेगारीवर नियंत्रण, महिला व मुलींच्या सुरक्षेला प्राधान्य, रोडरोमिओंना आळा आणि रात्रीच्या गस्तीत वाढ अशा अनेक अपेक्षा आता नव्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
कारवाईचा धडाका की ‘जैसे थे’ परिस्थिती?
शिरूर, शिक्रापूर आणि रांजणगाव गणपती या तीनही पोलीस ठाण्यांमध्ये नव्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतर नागरिकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असले, तरी प्रत्यक्षात अवैध धंदे, अमली पदार्थांचे जाळे, रोडरोमिओ आणि वाढत्या गुन्हेगारीवर कितपत प्रभावी कारवाई होते, यावरच त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन होणार आहे. आता संपूर्ण शिरूर तालुक्याच्या नजरा या तिन्ही नव्या पोलीस निरीक्षकांच्या पहिल्या मोठ्या कारवाईकडे लागल्या आहेत.







