इम्रान अत्तार

भोर: पठारावरील शंभू महादेवाच्या मंदिराची नव्याने डागडुजी करण्यात आली असली तरी सद्या मंदिर गळत असून मंदिरात पाणी साचत आहे. त्यामुळे शिवप्रेमी, पर्यटक, भाविक ग्रामस्थ यांच्याकडून नाराजी व्यक्त केली. पुरातत्व विभागाच्या माध्यमातून मंजूर ८२ लाख रुपये निधीतून रायरेश्वरावरील ऐतिहासिक शंभू महादेवाच्या मंदिराचे डागडुजीचे काम जानेवारी २०२५ पासून सुरू करण्यात आले होते. हे काम साधारण तीन महिने सुरू होते. दरम्यान, काम सुरु असताना मंदिर दर्शनासाठी काही दिवस बंद ठेवण्यात आले होते.

३ एप्रिल २०२५ रोजी पुरातत्व विभाग , स्थानिक ग्रामस्थ , शिवप्रेमी यांच्या सहभागातून मंदिराच्या झालेल्या कामाचा जिर्णोध्दार करण्यात आला. परंतु, सध्या हे मंदीर गळत असून मंदिराच्या गाभाऱ्यात गळती होत आहे. मंदिरात पावसाचे पाणी साठत असल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी मंदिराच्या छतावर कागदी ताडपत्री टाकून पाण्याच्या गळती पासून बचाव केला आहे.

श्री क्षेत्र रायरेश्वर हे असंख्य शिवप्रेमी, भाविक आणि पर्यटकांच्या श्रद्धेचे स्थान असून दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. मात्र, मंदिरामध्ये पावसाचे पाणी गळताना पाहून भाविकांच्या भावना दुखावतात. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मंदिराचे काम झाले, पण काम पूर्ण झाल्यानंतरही समस्या कायम राहिल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
पुरातत्त्व विभाग, महाराष्ट्र शासन, संबंधित प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी यांनी या विषयाची तातडीने दखल घेऊन कामाची तातडीने दुरूस्तीची मागणी स्वराज्यभूमी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे.
श्री क्षेत्र रायरेश्वर हे केवळ एक मंदिर नसून स्वराज्याच्या इतिहासातील एक अत्यंत पवित्र आणि प्रेरणादायी स्थान आहे. या भूमीशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या संकल्पनेच्या स्मृती जोडलेल्या आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन, जतन आणि योग्य देखभाल करणे ही शासन, प्रशासनासह सर्वांची जबाबदारी आहे. काम केल्यानंतर दिड वर्षातच मंदिरात गळती होऊ लागल्याने पुरातत्त्व विभागाकडून करण्यात आलेल्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.






