पुणे: पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय जगताप यांनी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा ई-मेलद्वारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यालयाकडे पाठवला असून, जिल्हा कार्याध्यक्ष संग्राम मोहोळ यांच्याकडे प्रत्यक्ष पत्रही सुपूर्त केले आहे. राजीनाम्याचे कारण मात्र ‘वैयक्तिक’ असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

संजय जगताप यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत त्यांनी मौन कायम ठेवले आहे. मात्र, त्यांच्या पक्षत्यागाच्या निर्णयाने पुरंदरमधील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राजकीय पार्श्वभूमी :
२००९ आणि २०१४ मध्ये पुरंदर विधानसभा मतदारसंघात विजय शिवतारे यांनी सलग दोनदा विजय मिळवला होता. मात्र, २०१९ मध्ये संजय जगताप यांनी त्यांचा पराभव केला. मात्र, २०२४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून संभाजी झेंडे यांना उमेदवारी मिळाली. त्यांनी घेतलेल्या ४७ हजार मतांमुळे मतांचे विभाजन झाले आणि शिवसेनेचे (शिंदे गट) विजय शिवतारे पुन्हा विजयी झाले.
या पराभवानंतर संजय जगताप सतत नाराज होते आणि काँग्रेस पक्षातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता त्यांच्या राजीनाम्यामुळे त्या चर्चांना पुष्टी मिळाली आहे.







