आदित्य बोराटे

इंदापूर: जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुणे जिल्ह्याचा निरोप घेण्यापूर्वी इंदापूर तालुक्यातील सराटी येथील मुक्कामानंतर सोमवारी पहाटे नीरा नदीच्या तीरावर पारंपरिक नीरा स्नान सोहळा भक्तिभावाने पार पडला. यावेळी संतांच्या पवित्र पादुकांचे विधिवत नीरा नदीत स्नान घालून आरती करण्यात आली. या सोहळ्याला हजारो वारकरी, भाविक आणि स्थानिक नागरिकांनी उपस्थित राहून भक्तिभावाने सहभाग नोंदविला.

पहाटेपासूनच नीरा नदी परिसरात वारकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. टाळ-मृदुंगाचा निनाद, हरिनामाचा गजर, भजन-कीर्तन आणि “ज्ञानोबा-तुकोबा”च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. पारंपरिक धार्मिक विधीनुसार पादुकांचे स्नान आणि पूजन झाल्यानंतर आरती करण्यात आली. या वेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
नीरा स्नान सोहळ्यानंतर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुणे जिल्ह्याचा निरोप घेत सोलापूर जिल्ह्याच्या दिशेने मार्गस्थ झाला. पालखीला निरोप देताना वारकरी आणि भाविकांच्या डोळ्यांत भक्तिभावासह भावनिक वातावरण पाहायला मिळाले. “पुन्हा भेटू या” या भावनेने वारकऱ्यांनी पालखीला निरोप दिला.
अध्यात्म, परंपरा आणि भक्तीचा संगम असलेल्या या नीरा स्नान सोहळ्याने आषाढी वारीच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असून, आता पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात उत्साहात स्वागत होणार आहे.







