दौंड, ता. 22 : नांदूर (ता. दौंड) येथील मे. विशाखा इंडस्ट्रीज लिमिटेडच्या कथित अनधिकृत बांधकामाचा मुद्दा मागील महिनाभरापासून चर्चेत असतानाच, आता याच परिसरातील चेरी कंपनीच्या आवारात गेट बंद करून तब्बल 70 ते 100 मोठ्या वृक्षांची कथितपणे बेकायदा तोड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार उघडकीस येऊन चार दिवस उलटूनही संबंधित प्रशासनाकडून ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. एवढेच नव्हे, तर अद्याप साधा पंचनामाही झाला नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

‘झाडे कापली जात असताना प्रशासन कुठे होते?’ आणि ‘तक्रार कोण करणार याची वाट पाहत प्रशासन बसले आहे का?’ असे संतप्त सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केले जात आहेत. नांदूर येथील बोराटे वस्ती परिसरात गट क्रमांक 94/1 व 94/2 येथे चेरी कंपनी आहे. शनिवारी (ता. 22) कंपनीच्या आवारात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच, वनविभागाचे भोंडवे व मस्के तसेच पोलिस अधिकारी गवारे घटनास्थळी दाखल झाले. मात्र, कंपनीचे गेट बंद असल्याने अधिकाऱ्यांनाही आत प्रवेश मिळाला नाही. अखेर संरक्षक भिंतीवरून आत प्रवेश करून वृक्षतोड थांबविण्यात आली.

यामुळे ‘सरकारी अधिकारी घटनास्थळी आले तरी कंपनीचे गेट उघडले जात नसेल, तर कंपनी प्रशासनाला कोणाची भीती आहे?’ असा सवाल उपस्थित झाला आहे. संबंधित कंपनी पूर्वी ‘मालवा मिराज’ या नावाने ओळखली जात होती आणि गेल्या काही वर्षांपासून बंद असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. कंपनीच्या आवारात मोठ्या प्रमाणात वृक्षसंपदा असल्याचे सांगितले जाते. मात्र, अवघ्या काही तासांत 70 ते 100 मोठ्या झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात आली आहे.

चार दिवस उलटले; पंचनामा अद्याप नाही!
वृक्षतोडीचा प्रकार समोर येऊन चार दिवस उलटले असतानाही अद्याप पंचनामा झालेला नसल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी “गुन्हा दाखल करण्यास आम्ही तयार आहोत; मात्र फिर्यादी कोण?” अशी भूमिका मांडल्याचे सांगण्यात येते. दुसरीकडे वनविभागाचे अधिकारी काळे यांनी पंचनामा अद्याप झालेला नसल्याचे सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे ‘झाडे तोडली गेली, अधिकारी घटनास्थळी गेले, तरी कारवाईची सुरुवात नेमकी कधी होणार?’ असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
प्रशासनाच्या भूमिकेवर संशयाचे ढग
संबंधित कंपनीवर कारवाई करण्याऐवजी विविध कारणे पुढे करून प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमका कोणाचा वरदहस्त आहे? कंपनीला प्रशासनाची भीती उरली नाही का? अशी चर्चा परिसरात सुरू झाली आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
वनविभाग आता झाडांची ‘मोजदाद’ करणार का?
वृक्षतोडीस संबंधित विभागाची परवानगी होती का? प्रत्यक्षात किती झाडे तोडण्यात आली? तोडलेल्या झाडांची विल्हेवाट कशी लावण्यात आली? वृक्षतोडीस जबाबदार कोण? तसेच परवानगीशिवाय वृक्षतोड झाल्याचे आढळल्यास संबंधित कंपनी व जबाबदार व्यक्तींवर कोणती कारवाई होणार?
दरम्यान, या सर्व प्रश्नांची उत्तरे आता वनविभाग आणि प्रशासनाला द्यावी लागणार आहेत. परवानगीशिवाय वृक्षतोड झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ व पर्यावरणप्रेमींनी केली आहे. ‘कंपनीचे गेट बंद असले तरी कायद्याचे दरवाजे बंद होऊ नयेत,’ अशी संतप्त भावना परिसरातून व्यक्त होत आहे.आता नांदूरच्या या कथित वृक्षतोडीप्रकरणी प्रशासन नेमकी काय कारवाई करते, पंचनामा कधी होतो आणि दोषींवर गुन्हा दाखल होणार का? याकडे संपूर्ण दौंड तालुक्याचे लक्ष लागले आहे.






