अक्षय टेमगिरे

शिरूर : शिरूर तालुक्यातील करडे गावात सराईत गुन्हेगारावर पिस्तुलातून गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना अवघ्या ७२ तासांच्या आत परजिल्ह्यातून ताब्यात घेत शिरूर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने पुन्हा एकदा आपल्या तपास कौशल्याची आणि वेगवान कारवाईची प्रचिती दिली आहे.

१८ जुलै रोजी मध्यरात्री करडे गावातील हनुमान मंदिराच्या पाठीमागे, भैरवनाथ मंदिराजवळील तळ्याच्या परिसरात जुन्या वादातून निखिल सतीश थेउरकर याच्यावर पिस्तुलातून तीन गोळ्या झाडून त्याचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
या घटनेमुळे संपूर्ण शिरूर तालुक्यात खळबळ उडाली होती. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील विविध गंभीर कलमांसह शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी तातडीने विशेष तपास पथके तयार केली. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज, गुप्त माहितीदारांचे जाळे आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यांच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला.
दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांना आरोपी सुपा ता. पारनेर, जि. अहिल्यानगर येथील बसस्थानक परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.
त्यानुसार डीबी पथकाने सापळा रचून अत्यंत शिताफीने पाच आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत दोन विधीसंघर्षित बालकांचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अथर्व उर्फ टिन्या शेळके, रोहन उर्फ दादया पंचमुख, आदित्य लंघे, निखिल कायस्थ आणि सनी मस्के यांचा समावेश आहे.
तपासात अथर्व शेळके आणि रोहन पंचमुख हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी खंडणी, अवैध शस्त्र बाळगणे, मारहाण यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निखिल थेउरकर याच्यावरही यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, अवैध अग्निशस्त्र बाळगणे आणि गंभीर मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. फिर्यादीकडून यापूर्वी आरोपींना झालेल्या मारहाणीचा राग मनात धरून हा जीवघेणा हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
या संपूर्ण कारवाईमुळे शिरूर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने केवळ आरोपींना अल्पावधीत जेरबंद केले नाही, तर गुन्हेगारांना कायद्याचा धाकही दाखवून दिला आहे.
संवेदनशील आणि तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊ शकणाऱ्या या प्रकरणाचा वेगाने उलगडा करून पोलिसांनी नागरिकांचा विश्वास अधिक दृढ केला आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले आणि पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, राकेश मुळीक, पोलीस हवालदार अक्षय कळमकर, शरद वारे, राहुल भवर तसेच विजय शिंदे, नितेश थोरात, नीरज पिसाळ, सचिन भोई, निखिल रावडे, अंबादास थोरे, रविंद्र काळे, अजय पाटील, दादाराव नागरे आदींच्या पथकाने पार पाडली आहे.
करडे गोळीबार प्रकरणाचा अवघ्या ७२ तासांत उलगडा करून आरोपींना परजिल्ह्यातून अटक करणाऱ्या शिरूर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर असल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून गेला आहे.







