पुणे: आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, उमेदवार मतदारांपर्यंत आपला विकासाचा अजेंडा मांडत आहेत. या पार्श्वभूमीवर उरुळी कांचन ग्रामपंचायतच्या माजी सदस्या आणि भाजपच्या पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवार सारिका लोणारी यांनी जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी आपण निवडणूक रिंगणात उतरलो असल्याचे स्पष्ट केले आहे. (Uruli Kanchan Sarika Lonari)

सारिका लोणारी या गेली 15 ते 20 वर्षे सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून सलग दहा वर्षे काम केले असून, या काळात परिसरातील मूलभूत समस्यांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. “ग्रामपंचायतीत काम करताना अनेक अडचणी समोर आल्या. त्या सोडवण्यासाठी व्यापक स्तरावर काम करण्याची गरज वाटली आणि म्हणूनच पंचायत समितीची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला,” असे त्यांनी सांगितले. त्या आतापर्यंत दोन वेळा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत.

‘पुणे प्राईम न्यूज’शी बोलताना लोणारी यांनी उरुळी कांचन परिसरातील विकासकामांचा आढावा घेतला. पाणीपुरवठा, वीज, रस्ते आणि ड्रेनेज यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव होता. महात्मा गांधी विद्यालयापासून मणिभाई विहिरीपर्यंत मोठी लोकवस्ती असूनही रस्त्याची सोय नव्हती. मात्र गेल्या दहा वर्षांत स्वच्छ पाणीपुरवठा, दर्जेदार रस्ते आणि ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्यास महिला सक्षमीकरण आणि रोजगारनिर्मितीला प्राधान्य देणार असल्याचेही लोणारी यांनी सांगितले. त्यांनी आतापर्यंत अनेक बचतगट स्थापन करून महिलांना बँकिंग व्यवहारांचे ज्ञान, आर्थिक नियोजन तसेच स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले आहे. शिलाई मशीन, घरगुती उद्योगांचे प्रशिक्षण देण्यात आले असून, पुढील टप्प्यात तरुणांसाठी कंपन्यांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यासाठी आवश्यक ते शासकीय सहाय्य घेण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.
शेतीपूरक योजनांबाबत बोलताना त्यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीची अवजारे, गोठे, विहिरी यांसाठी अनुदान पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच शाळांना संगणक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
शिधापत्रिका आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेवरही काम करण्याचा आपला मानस असल्याचे लोणारी यांनी स्पष्ट केले. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असून, आतापर्यंत सुमारे एक हजार लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरण यादीत समाविष्ट करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
“मी विरोधासाठी नव्हे, तर विकासासाठी काम करते. काम करणारी कार्यकर्ती म्हणूनच माझी ओळख आहे. जनतेचे प्रेम आणि विश्वास हेच माझे भांडवल आहे,” असे सांगत उरुळी कांचन पंचायत समिती गणातून भाजपची उमेदवार म्हणून निवडणूक लढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जनतेने एकदा संधी दिल्यास त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.







