यवत: अनुदानीत खताच्या विक्रीसोबत शेतकऱ्यांना विनाअनुदानीत खते व इतर कृषी निविष्ठा सक्तीने विक्री केली जात असल्याच्या संशयावरून कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने कडेठाण (ता. दौंड) येथील आदित्य कृषी सेवा केंद्रावर १२ ऑगस्ट रोजी धडक तपासणी केली. या तपासणीत मोठ्या प्रमाणात युरिया व ऑरगॅनिक मॅन्युअरचा साठा आढळून आला. खताच्या बॅच क्रमांकांमध्येही विसंगती आढळल्याने संबंधित कंपनीविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दशरथभाई दाभी सुरेशभाई असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी कैलास बाबासाहेब चव्हाण (वय ५६, कृषी अधिकारी निविष्ठा व गुण नियंत्रण, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, दौंड) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या आदेशानुसार जिल्हास्तरीय भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकात मोहीम अधिकारी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक तसेच संबंधित तालुक्याचे कृषी अधिकारी गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांचा समावेश आहे. या पथकातील कैलास चव्हाण, मोहीम अधिकारी विनय दिलीपराव कदम आणि जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक धनंजय दिनकर पाटील हे १२ ऑगस्ट रोजी कडेठाण परिसरात कृषी निविष्ठांची तपासणी करीत होते. यावेळी आदित्य कृषी सेवा केंद्राची तपासणी करण्यात आली.

१०.१७ मेट्रिक टन युरिया आढळला
तपासणीदरम्यान Narmada Bio-Chem Limited, अहमदाबाद या कंपनीचा ४५ किलो वजनाच्या २२६ पोत्यांचा, म्हणजेच १०.१७ मेट्रिक टन निमकोटेड युरियाचा साठा आढळून आला. तसेच याच कंपनीच्या ५० किलो वजनाच्या १८४ बॅग, म्हणजेच ९.२० मेट्रिक टन ऑरगॅनिक मॅन्युअर (बायो-गोल्ड+) खताचा साठाही आढळला.
विशेष म्हणजे, या ऑरगॅनिक मॅन्युअरच्या बिलावर बॅच क्रमांक A2/BG/024/011 नमूद असल्याचे तपासणी पथकाच्या निदर्शनास आले. मात्र, प्रत्यक्ष साठवणूक गृहातील खताच्या बॅगवर A1/BG/026/017 आणि A1/BG/026/018 हे वेगळे बॅच क्रमांक आढळल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
शासनाच्या परिपत्रकाचा भंग केल्याचा आरोप
या बॅच क्रमांकांमधील विसंगतीच्या आधारे संबंधित खताचा पुरवठा शासनाच्या २० मे २०२६ रोजीच्या परिपत्रकाचा भंग करून करण्यात आल्याचे तपासणी पथकाच्या निदर्शनास आले, असा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी Narmada Bio-Chem Limited कंपनीचे संचालक मंडळ तसेच कंपनीचे केमिस्ट दशरथभाई दाभी सुरेशभाई यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा
१२ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ५.४५ ते ७.५५ वाजण्याच्या दरम्यान कडेठाण येथील आदित्य कृषी सेवा केंद्रात झालेल्या तपासणीदरम्यान शासनाच्या परिपत्रकाचे तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ मधील कलम ३(२)(ड) मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी कलम १० अन्वये यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, कृषी विभाग व पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे खत विक्रीतील अनियमितता, अनुदानीत खतासोबत विनाअनुदानीत खताची सक्तीची विक्री आणि खताच्या बॅच क्रमांकातील विसंगती याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाच्या पुढील तपासात नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.







