न्हावरे: चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या कामातील कथित अन्यायकारक नियोजनाविरोधात आंबळे (ता.शिरूर) परिसरातील शेतकऱ्यांचा संताप अखेर उफाळून आला. निमोणे रोडवरील शेतकरी प्रमोद बेंद्रे यांच्या घरासमोरील कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम संतप्त शेतकऱ्यांनी आज (ता.२७) सकाळी सुमारे ११ वाजता थेट बंद पाडत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

मोठ्या संख्येने शेतकरी घटनास्थळी एकत्र आले आणि मशिनरीच्या साहाय्याने सुरू असलेले अस्तरीकरणाचे काम थांबवले. यावेळी शेतकरी कृती समितीचे सदस्य,माजी सरपंच तात्यासाहेब सोनवणे, दादासाहेब बेंद्रे,अशितोष बेंद्रे,सागर खंडागळे, विशाल झेंडे, गणेश बेंद्रे,पंचायत समिती सदस्य दीपक कोकडे, सरपंच श्रीराम शेलार,अशोक कोळपे, मयूर बेंद्रे,सचिन बेंद्रे,अक्षय नरवडे, निलेश बेंद्रे यांच्यासह महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या ‘टेल-टू-हेड’ या अस्तरीकरणाच्या पद्धतीवर तीव्र आक्षेप घेतला. कालव्याच्या शेवटच्या टोकापासून काम सुरू करण्याऐवजी ज्या ‘हेड’ कडील भागात सर्वाधिक पाण्याची गळती होत आहे. त्या भागाचे अस्तरीकरण प्राधान्याने करण्यात यावे, अशी ठाम मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली. लाखो लिटर पाणी गळतीमुळे वाया जात असताना गळतीच्या मूळ ठिकाणाकडे दुर्लक्ष करून अन्य भागात काम सुरू ठेवणे हा शेतकऱ्यांवर अन्याय असल्याचा आरोपही यावेळी शेतकऱ्यांनी केला.
याशिवाय चासकमान धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असतानाही डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात येत नसल्याने शेतीला मोठा फटका बसत आहे.त्यामुळे तातडीने कालव्यात पाणी सोडून खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.अशी मागणीही संतप्त शेतकऱ्यांनी केली.
आंबळे (ता.शिरूर) येथील या आंदोलनामुळे चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाचा प्रश्न अधिकच चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून गळतीच्या मुख्य भागापासून अस्तरीकरण सुरू करावे.अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.






