पुणे: चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अतिक्रमणांविरोधात मोठी कारवाई सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) पोलीस बंदोबस्तात ही मोहीम हाती घेतली असून आतापर्यंत 85 अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. रस्त्यांच्या कडेला उभारण्यात आलेली अनधिकृत दुकाने आणि इतर बांधकामे हटवल्यामुळे वाहतुकीतील अडथळे कमी झाले आहेत.

चाकण परिसरातील प्रमुख रस्त्यांवर अनेक ठिकाणी भंगार दुकाने, चहाच्या टपऱ्या, हॉटेल, मिठाईची दुकाने आणि गॅरेज उभारण्यात आले होते. या अतिक्रमणांमुळे रस्त्यांची जागा कमी होऊन वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यातच खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीत आणखी वाढ होत होती.

चाकण औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या समस्यांवरून गेल्या काही काळापासून नाराजी व्यक्त केली जात आहे. काही लघुउद्योगांनी परिसरातून स्थलांतर करण्याचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. रस्ते दुरुस्तीच्या कामांनाही वेग देण्यात येत आहे.

एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता प्रकाश भंडांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधितांना कारवाईचा इशारा दिल्यानंतर 30 ऑगस्टपासून प्रत्यक्ष अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली.
चाकण औद्योगिक क्षेत्रातील टप्पा क्रमांक 2 मधील 85 अतिक्रमणे दोन दिवसांत हटविण्यात आली. आता टप्पा क्रमांक 1, 3 आणि 4 मध्येही कारवाई करण्याची तयारी सुरू आहे. या कारवाईमुळे पुणे-नाशिक महामार्ग तसेच तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. अतिक्रमणे हटवल्याने चाकणमधील वाहतुकीचा वेग वाढण्यास मदत होऊ शकते.






