यवत, ता. २३ : दौंड तालुक्यातील बिरोबावाडी येथे सामाईक शेतजमीन आणि विहिरीच्या पाण्याच्या वादातून सख्ख्या भावांमध्ये गंभीर संघर्ष उफाळून आला. ऊसाला सोडलेले पाणी वळविल्याचा जाब विचारणाऱ्या शिक्षकाला त्याच्याच भावाने काठीने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना रविवारी (ता.२१ जून) दुपारी घडली आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष दत्तात्रय होले (रा. बिरोबावाडी, ता. दौंड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भागवत विद्यालय, पाटस येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले राजेंद्र दत्तात्रय होले (वय ५४, रा. हडपसर, मूळ रा. बिरोबावाडी, ता. दौंड) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेंद्र होले यांच्या कुटुंबीयांची गट क्रमांक ८९/२/ब, १२२५ व ८९/३/१ मधील सामाईक शेतजमिनीबाबत दिवाणी न्यायालयात वाद सुरू आहे. ते पत्नी नेहा यांच्यासह शेतातील ऊसाला सोडलेले पाणी सुरू आहे का, हे पाहण्यासाठी गेले असता विहिरीचे पाणी भाऊ संतोष दत्तात्रय होले यांच्या शेताकडे वळविल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर घरी परतल्यानंतर राजेंद्र होले यांनी संतोष यांना याबाबत जाब विचारला. “माझा ऊस जळत असताना तू रात्रीचे पाणी का चोरून घेतोस?” असे विचारताच संतोष यांनी शिवीगाळ करत वाद घातला.
फिर्यादीनुसार, संतोष होले यांनी हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जमिनीवर पडलेली लाकडी काठी उचलून राजेंद्र होले यांच्या हातावर व पाठीवर प्रहार केला. तसेच हातात कुऱ्हाड घेऊन अंगावर धावून जात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पतीला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या नेहा होले यांनाही शिवीगाळ व दमदाटी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, या घटनेनंतर उपचारासाठी वरवंड ग्रामीण रुग्णालयात गेल्यानंतरही संतोष होले तेथे येऊन पुन्हा अंगावर धावून आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी संतोष होले यांच्याविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२ व ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.






