पुणे: पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हवेली आणि राजगड तालुक्यातील दोन जुन्या पुलांची अवस्था धोकादायक झाल्यामुळे प्रशासनाने त्यावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांना आता पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.

हवेली तालुक्यातील कातवडी–कॉदूर–निळकंठेश्वर मार्गावरील मुठा नदीवरील पूल अत्यंत जीर्ण झाला आहे. पुलाची संरचना कमकुवत झाल्याने तो वाहतुकीसाठी सुरक्षित नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे हा पूल कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे.
या पुलाच्या बंदीमुळे कातवडीकडून डावजे आणि कुरण परिसराकडे जाणाऱ्या वाहनांची वाहतूक कातवडी–बहुली–कोंढूर–डावजे–जांभळी–कुरण या मार्गाने वळविण्यात आली आहे. तसेच कुरण आणि डावजे भागातून कातवडीकडे येणाऱ्या वाहनांनी कुरण–जांभळी–डावजे–कोंढूर–बहुली–कातवडी या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे प्रशासनाने सांगितले आहे.
दरम्यान, राजगड तालुक्यातील खानापूर–पानशेत मार्गावरील पानशेत वसाहतीजवळील सुमारे 68 वर्षे जुना पूलही धोकादायक स्थितीत असल्याचे आढळून आले आहे. पुलाची संरचनात्मक क्षमता कमी झाल्यामुळे या पुलावरून सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली आहे.
या निर्णयानंतर लवासा आणि वरसगाव परिसरातून पानशेतकडे जाणारी वाहतूक निळकंठेश्वर–डावजे–कोंढूर–बहुली–कातवडी–मांडवी–कुडजे–खडकवासला धरणमार्ग–गोऱ्हे–खानापूर या मार्गाने वळविण्यात आली आहे. तसेच पानशेत आणि वरसगाव भागातून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांसाठी कुरण खुर्द–राणवडी–सोनपूर–ओसाडे–खानापूर–गोऱ्हे–खडकवासला धरणमार्ग–कुडजे–मांडवी–कातवडी–बहुली–कोंढूर–डावजे–निळकंठेश्वर हा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करून प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.







