भिगवण, (पुणे) : खडकवासला कालव्याचे (Bhigwan News) आवर्तन तातडीने सुरू करावे या मागणीसाठी शासनाची बंदी झुगारून पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर तीव्र रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या 11 प्रमुख नेत्यांसह सुमारे 200 ते 250 अनोळखी आंदोलनकर्त्यांवर भिगवण पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परवानगी नाकारलेली असतानाही डाळज नंबर 2 च्या हद्दीत महामार्गाच्या दोन्ही लेन आणि सर्व्हिस रोडवर ठिय्या मांडल्याने पोलिसांनी ही मोठी कायदेशीर कारवाई केली आहे.

विजय बबन गावडे, दादासाहेब संभाजी खारतोडे, बाबा महाराज खारतोडे, रमेश खारतोडे, निवृत्ती भाऊसाो गायकवाड, 6) अरविंद गायकवाड, भाऊ बाळासो खारतोडे, स्वप्नील पाटील (सर्व रा. कळस, ता. इंदापूर), तानाजी मारकड, अनिकेत लावंड, (दोघे रा. रुई), जनार्दन पांढरमिसे रा. थोरातवाडी तसेच इतर 200 ते 250 अनोळखी इसमांवर भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक नाना वामण वीर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. 17) विजय बबन गावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रशासनाला खडकवासला कालव्याचे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्याचे निवेदन दिले होते. मात्र, महामार्गावरील कायदा व सुव्यवस्था आणि वाहतूक कोंडी लक्षात घेऊन पोलिसांनी या आंदोलनाला अधिकृत परवानगी नाकारली होती.

परवानगी नसतानाही सोमवारी (ता. 18) सकाळी साडेआठ वाजल्यापासूनच डाळज नंबर 2 हद्दीत सर्व्हिस रोडवर शेतकऱ्यांचे जथ्ते जमू लागले होते. तेथे सकाळी साडेदहा वाजेपर्यंत आंदोलक नेत्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यादरम्यान जलसंपदा विभागाचे (पाटबंधारे) अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांच्यात चर्चा झाली, मात्र अधिकाऱ्यांच्या आश्वासनाने शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या नेत्यांनी उपस्थित जनसमुदायाला महामार्ग रोखण्याचे आवाहन केले.
सकाळी साडेदहा ते साडेअकरा वाजण्याच्या या एक तासाच्या कालावधीत सुमारे 200 ते 250 आंदोलक शेतकरी आणि प्रमुख नेते पुणे-सोलापूर महामार्गाच्या दोन्ही लेन आणि सर्व्हिस रोडवर ठिय्या देऊन बसले. यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहने अडवून प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्यास प्रतिबंध केल्याने आणि नागरिकांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी अखेर गुन्ह्याची नोंद केली.
दरम्यान, भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नाना वीर यांनी सरकारतर्फे याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 126(2), 223, 189(2), 189(3) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







