पुणे : आगामी निवडणुका लक्षात घेऊन विरोधी पक्षातील प्रमुख घटक असलेल्या काँग्रेसने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. युवा वर्ग आणि इतर मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुण्यात ‘छात्रों की गूंज’ हा विशेष कार्यक्रम पार पडला होता.आता या सर्व तयारीदरम्यान काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाकडून एक महत्त्वाचा संघटनात्मक निर्णय घेण्यात आला आहे.

दिल्लीतील वरिष्ठ पातळीवरून आलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र काँग्रेसच्या संघटन रचनेत मोठा बदल करण्यात आला आहे. पक्षाने राज्याच्या प्रभारी पदावर नवीन नेत्याची नेमणूक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील ज्येष्ठ नेते डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या नवे प्रभारी म्हणून निवड झाली आहे. त्यांनी याआधी रमेश चेन्नीथला यांच्याकडे असणारा हा पदभार आता स्वीकारला आहे.

प्रसाद यांना संघटन कामाचा अधिक अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी झारखंड राज्याचे काँग्रेस प्रभारी म्हणून जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. संघटन कौशल्याचा हाच अनुभव आता महाराष्ट्रात पक्षाला बळ देण्यासाठी उपयुक्त ठरेल.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्या प्रभारींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र काँग्रेसमध्ये काय महत्त्वाचे बदल होतात आणि पक्षाची नवी रणनीती कशी ठरते, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






