बारामती: बारामती शहराच्या आणि ग्रामीण भागाच्या सुरक्षेसाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे. बारामती ग्रामीण पोलीस आणि येथील विविध कंपन्यांनी एकत्र येत शहराच्या महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रकल्प पूर्ण केला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. यामुळे गुन्हेगारीला लगाम लावणे आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे पोलिसांना आता अधिक सोपे जाणार आहे.

या शुभारंभ प्रसंगी एमआयडीसीचे विभागीय कार्यकारी अधिकारी हनुमंतराव पाटील, बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि बीआयडीए (BIDA) बारामतीचे अध्यक्ष धनंजय जामदार उपस्थित होते. या महत्त्वाच्या उपक्रमात बारामती एमआयडीसी, तांदूळवाडी आणि काटेवाडी भागातील अनेक सामाजिक कार्यकर्ते व उद्योजकांचा मोलाचा वाटा आहे. यामध्ये बारामती कॅटल फीडचे अभिजित शिंदे, दिगंबर बेलदार (तांदूळवाडी, श्रीधर घुले (उपसरपंच, काटेवाडी), पोलीस पाटील (काटेवाडी आणि कृष्णा ताटे यांनी पुढाकार घेऊन आर्थिक मदत केली आहे. या सर्वांचे पोलीस प्रशासनाकडून विशेष कौतुक करण्यात आले.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव म्हणाले की, वेगाने वाढणाऱ्या शहरीकरणामुळे आधुनिक सुरक्षा व्यवस्था काळाची गरज बनली आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे, गुन्ह्यांचा तपास जलद करणे आणि अपघाताच्या वेळी वेळेत मदत पोहचवणे शक्य होईल. एमआयडीसी परिसर, प्रमुख चौक आणि गर्दीच्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने हे कॅमेरे सुरु केले जात आहेत. हा प्रकल्प पोलीस प्रशासन आणि उद्योग क्षेत्रातील उत्तम समन्वयाचे प्रतीक असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, कल्याण शिंगाडे, निलेश वाकळे व नितीन ढवण यांनी विशेष परिश्रम घेतले. सीसीटीव्हीमुळे गुन्हेगारांवर वचक बसण्यासोबतच नागरिकांमध्येही सुरक्षिततेची भावना वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले असून, भविष्यात अधिक व्यापक सुरक्षा यंत्रणा उभारण्याचा मानस प्रशासनाने बोलून दाखवला आहे.






