पुणे: पावसाच्या कमतरतेमुळे पुण्यात पाणीटंचाई निर्माण झाली असून महापालिकेने विविध भागांत पाणीकपात सुरू केली आहे. मात्र, आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या ९ आणि 10 जुलै रोजी पुण्यात मुक्कामी असणार आहेत. या काळात शहरात लाखो वारकऱ्यांचे आगमन होत असल्याने, भाविकांच्या सोयीसाठी त्या दोन दिवसांची नियोजित पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. या कालावधीत ‘सेवा वारी’ हा विशेष उपक्रमही राबवला जाणार आहे.

दुसरीकडे, जुलैच्या सुरुवातीलाच तांत्रिक अडचणींमुळे काही भागांत पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. पर्वती एचएलआर गोल टाकीजवळील 1,200 मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने, दुरुस्तीसाठी 2 जुलै रोजी पर्वती पंपिंग स्टेशनचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. याचा परिणाम सहकारनगर, पर्वती, धनकवडी, मार्केट यार्ड, महर्षीनगर, शिवदर्शन, आंबेगाव आणि परिसरातील अनेक सोसायट्यांवर होईल. दुरुस्तीनंतर 3 जुलै रोजी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

याव्यतिरिक्त, भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून असलेल्या भागांतील रहिवाशांसाठी कठीण काळ आहे. धरणातील पाणीसाठा 2.19 टीएमसीपर्यंत खाली आल्यामुळे, महापालिकेने 12 जुलैपासून या भागात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. येरवडा, विश्रांतवाडी, लोहगाव, कळस, धानोरी, विमाननगर, खराडी, वडगावशेरी आणि वाघोलीच्या काही भागांना या कपातीचा सामना करावा लागणार आहे. पावसाने अद्याप जोर धरलेला नाही, त्यामुळे पाणी नियोजनाचे हे कडक नियम आगामी काळातही पाळावे लागणार असल्याची शक्यता आहे. या गंभीर परिस्थितीचा विचार करता, सर्व पुणेकर नागरिकांनी पाणी जपून आणि काटकसरीने वापरणे काळाची गरज बनली आहे.








