पुणे: औंध परिसरातील एका व्यावसायिक इमारतीवरून वाद निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. लिव्ह अँड लायसन्स कराराची मुदत संपल्यानंतरही जागा खाली न करता, ती परत हवी असेल तर दोन कोटी रुपये द्यावे लागतील, अन्यथा मालमत्ता विसरून जा, अशी धमकी दिल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी दोन भावांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी महेंद्र संपतराव गोडगे (वय ४९, रा. शिवाजीनगर) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार सत्यप्रकाश शंभू पोद्दार (वय ४७) आणि प्रदीप शंभू पोद्दार (वय ४२, दोघे रा. औंध) यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेंद्र गोडगे यांच्या औंध येथील व्यावसायिक इमारतीतील जागा सत्यप्रकाश पोद्दार यांना लिव्ह अँड लायसन्स कराराने देण्यात आली होती. या ठिकाणी त्यांनी गेस्ट हाऊस सुरू केले होते. मात्र, ३० जून २०२१ रोजी कराराची मुदत संपल्यानंतरही त्यांनी जागा खाली केली नाही. तसेच त्यानंतरचे भाडेही दिले नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, १३ जून २०२६ रोजी प्रदीप पोद्दार हे फिर्यादींच्या कार्यालयात आले. त्यावेळी त्यांनी ही मालमत्ता परत देणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी सत्यप्रकाश पोद्दार यांना फोन लावला. फोनवरून सत्यप्रकाश पोद्दार यांनी, “जागा परत हवी असेल तर दोन कोटी रुपये द्या, नाहीतर मालमत्ता विसरून जा. आम्ही जागा सोडणार नाही. माझे अनेक गुन्हेगार टोळ्यांशी संबंध आहेत. गरज पडल्यास मालमत्ता पेटवून देईन,” अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादींनी केला आहे.
याशिवाय प्रदीप पोद्दार यांनीही सत्यप्रकाश यांनी सांगितल्याप्रमाणे केले नाही, तर फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या धमक्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने तक्रार करण्यास उशीर झाल्याचे फिर्यादींनी पोलिसांना सांगितले. अखेर त्यांनी धाडस करून तक्रार दाखल केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार करत आहेत.







