लोणी काळभोर, ता. ३ : पूर्व हवेली परिसरातील काही सराफा व्यावसायिकांकडून ‘सुवर्ण भिशी’ (बीसी) योजनांच्या नावाखाली दरमहा लाखो रुपयांची रक्कम ग्राहकांकडून गोळा केली जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे. अशा योजनांसाठी आवश्यक कायदेशीर परवानग्या आहेत का, या प्रश्नावरही नागरिकांनी शंका उपस्थित करत संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या योजनांमध्ये ग्राहकांकडून सलग ११ महिने ठरावीक रक्कम जमा करून घेतली जाते. बाराव्या महिन्याचा हप्ता व्यावसायिक भरत असल्याचे आमिष दाखवले जाते; मात्र मुदत पूर्ण झाल्यानंतर ग्राहकांना रोख रक्कम परत न देता त्याच रकमेतून सोने खरेदी करण्यास भाग पाडले जाते. त्यामुळे या योजनेत ग्राहकांच्या पैशाचा फायदा व्यावसायिकांनाच होत असल्याचा आरोप होत आहे.

लोणी स्टेशन, लोणी काळभोर, कुंजीरवाडी आणि उरुळी कांचन परिसरातील अनेक सराफा दुकानदार अशा प्रकारच्या योजना राबवत आहेत. या योजनांची कायदेशीरता, निधी संकलनाचे अधिकार आणि आर्थिक व्यवहारांची पारदर्शकता याची संबंधित यंत्रणांनी तपासणी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.जर एखादा व्यावसायिक अचानक दुकान बंद करून फरार झाला, तर ग्राहकांच्या आयुष्यभराच्या बचतीवर पाणी फिरू शकते. त्यामुळे अशा योजनांमध्ये पैसे गुंतविण्यापूर्वी नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रात यापूर्वीही सुवर्ण भिशी किंवा सोन्याच्या गुंतवणुकीच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अशा घटनांमध्ये ग्राहकांकडून दीर्घकाळ पैसे जमा करून घेतल्यानंतर काही सराफा व्यावसायिकांनी कोट्यवधी रुपयांसह पसार झाल्याची प्रकरणे उघडकीस आली होती. सहा वर्षांपूर्वी पूर्व हवेली परिसरातील शेकडो नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम गोळा करून एका सराफा व्यावसायिकाने कुटुंबासह फरार झाल्याची घटना घडली होती. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा अशा प्रकारच्या योजनांची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
ईडी, आर्थिक गुन्हे शाखा, आयकर विभाग आणि संबंधित आर्थिक नियामक संस्थांनी पूर्व हवेलीतील सुवर्ण भिशी योजनांची सखोल चौकशी करून त्या कायदेशीर आहेत का, याची पडताळणी करावी. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करून ग्राहकांचे हित सुरक्षित करावे, अशी मागणी नागरिकांकडून आता जोर धरू लागली आहे.







