पुणे : राज्य सरकारच्या नियमांनुसार एका लाभार्थ्याला एकाच वेळी दोन शासकीय योजनांचा आर्थिक लाभ घेता येत नाही. ज्या महिला आधीपासूनच ‘संजय गांधी निराधार योजने’चा आर्थिक लाभ घेत आहेत त्यांना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसला आहे.

वार्षिक २.५ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा १,५०० रुपये जमा केले जातात. विधानसभा निवडणुकीदरम्यान, पुन्हा सत्ता आल्यास ही मदत २,१०० रुपये करण्याची घोषणा सरकारने केली होती. मात्र, सत्ता मिळून मोठा कालावधी उलटल्यानंतरही ही रक्कम वाढवण्यात आलेली नाही. त्यामुळे २,१०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार, याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, गेल्या काही काळापासून लाडकी बहीण योजना विविध कारणांमुळे राजकीय चर्चेत आहे. सरकारने केवायसी (KYC) प्रक्रिया अनिवार्य केल्यानंतर पडताळणीदरम्यान लाखो महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात आली आहेत. यामुळे विरोधकांनी सरकारवर टीका करत, ही योजना फक्त निवडणुकीपुरतीच मर्यादित होती का, असा सवाल उपस्थित केला आहे.
त्यातच, एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची नावे कमी करण्याचे धोरण प्रशासनाने कडक केले आहे. जर एखादी महिला संजय गांधी निराधार योजनेसारख्या इतर कोणत्याही सरकारी योजनेचा फायदा घेत असेल, तर तिला लाडकी बहीण योजनेची रक्कम मिळणार नाही.







