Yerwada to Katraj : पुणे : पुणे शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने म्हणजेच पीएमआरडीएने (PMRDA) एका मोठ्या भुयारी मार्ग प्रकल्पावर काम सुरू केले आहे. शहराच्या उत्तर आणि दक्षिण भागाला जोडणाऱ्या येरवडा ते कात्रज (Yerwada to Katraj) या साधारण 54 किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित मार्गाच्या आराखड्यात आता काही महत्त्वाचे बदल केले जात आहेत.

केवळ एकाच मार्गावर लक्ष केंद्रित न करता शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागातील मुख्य रस्ते या प्रकल्पाला कसे जोडता येतील, यादृष्टीने प्रशासनाकडून चाचपणी केली जात आहे. हा प्रकल्प पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून यामुळे प्रवासाचा वेग वाढण्यास मदत होणार आहे.
या संदर्भात विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सुमारे 32000 कोटी रुपयांच्या या महाकाय प्रकल्पावर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रकल्पाची व्यवहार्यता तपासल्याशिवाय आणि विविध तांत्रिक बाबींचे रेटिंग निश्चित केल्याशिवाय या प्रकल्पाच्या अंतिम अहवालावर शिक्कामोर्तब केले जाणार नाही, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. भुयारी मार्गातून बाहेर पडणारी वाहतूक पुन्हा मुख्य रस्त्यांवर आल्यावर तिथे कोंडी निर्माण होऊ नये, याची विशेष काळजी या आराखड्यात घेतली जात आहे. त्यासाठी शहराच्या गरजेनुसार 6 ते 7 वेगवेगळ्या उप-मार्गांचा सध्या सखोल अभ्यास केला जात आहे.
या प्रकल्पाची सांगड शहराच्या पार्किंग धोरणाशी घालणे आवश्यक असल्याचे मत महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. नागरिकांच्या प्रवासाची पद्धत आणि त्यांची दिशा यांचा सखोल अभ्यास करूनच मार्ग निश्चित केला जाणार आहे. जर हा 54 किलोमीटरचा भुयारी मार्ग यशस्वी झाला, तर येरवडा ते कात्रज हे दीड ते दोन तासांचे अंतर कापण्यासाठी केवळ 20 ते 25 मिनिटे लागतील असा अंदाज आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांवरील मोठ्या प्रमाणावरील वाहतूक जमिनीखाली वळवल्यामुळे सिग्नलवर होणारी गर्दी कमी होईल. हा प्रकल्प येणाऱ्या काळात पुणेकरांच्या प्रवासाचा चेहरामोहरा बदलणारा ठरू शकतो, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.






