पुणे: राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत शासनाने महत्त्वाचे बदल केले आहेत. या पदाची भरती आता ऑनलाईनऐवजी ऑफलाईन पद्धतीने करण्यात येणार असून, स्थानिक उमेदवारांना 100 टक्के प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहकार विभागाचे अपर निबंधक संतोष पाटील यांनी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे.

शासनाने शिपाई पदासाठी किमान शैक्षणिक पात्रताही निश्चित केली आहे. या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार किमान 12 वी उत्तीर्ण असणे अनिवार्य राहणार आहे. यापूर्वी सुरक्षा रक्षक, वाहनचालक तसेच नाबार्डच्या अहवालानुसार वरिष्ठ, मध्यम, कनिष्ठ व्यवस्थापन आणि तांत्रिक पदे ऑनलाईन भरती प्रक्रियेतून वगळण्यात आली होती. त्याच धर्तीवर आता शिपाई पदाचाही समावेश करण्यात आला आहे.

भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना ऑफलाईन लेखी परीक्षा घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही परीक्षा अनुभवी आणि तज्ज्ञ एजन्सीमार्फत घेण्यात येणार आहे. परीक्षा प्रक्रियेत कोणताही गैरव्यवहार होणार नाही, याची संपूर्ण जबाबदारी बँकेच्या संचालक मंडळावर असणार आहे.
शासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, भरती प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार किंवा गैरव्यवहार झाल्यास संबंधित बँकेच्या संचालक मंडळावर थेट कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
नव्या निर्णयानुसार स्थानिक उमेदवारांना 100 टक्के प्राधान्य दिले जाणार आहे. मात्र, एखाद्या जिल्ह्यात आवश्यक संख्येने पात्र स्थानिक उमेदवार उपलब्ध न झाल्यासच संबंधित बँकेला जिल्ह्याबाहेरील उमेदवारांमधून रिक्त पदे भरण्याची परवानगी दिली जाणार आहे.






