पुणे: मान्सून उशिरा दाखल होत असल्याने आणि खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्यामुळे पुणेकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने 15 जूनपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर मंजूषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. नव्या पाणीपुरवठा वेळापत्रकाबाबतचे सविस्तर परिपत्रक पुढील दोन दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे.

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमध्ये मिळून सध्या केवळ 5.01 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. पुढील तीन महिने पिण्याच्या पाण्याची गरज, आषाढी वारीसाठी लागणारे पाणी तसेच शेतीसाठी आवश्यक पाण्याचा विचार करता उपलब्ध साठ्याचे काटेकोर नियोजन करणे गरजेचे असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. बैठकीला उपमहापौर परशुराम वाडेकर, सभागृह नेते गणेश बीडकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते नीलेश निकम, काँग्रेसचे गटनेते चंदू कदम, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर आणि पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप उपस्थित होते.
महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी सांगितले की, ज्या भागांमध्ये आधीपासूनच कमी दाबाने किंवा एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे, त्या ठिकाणी अतिरिक्त कपात केली जाणार नाही. हडपसर, काळेपडळ, कोल्हेवाडी, नांदोशी, महंमदवाडी, शिवाजीनगरमधील काही भाग, भाग्योदयनगर, कोंढवा आणि धायरी या परिसरांना याचा दिलासा मिळणार आहे.
पाण्याची बचत करण्यासाठी शहरातील वाहन धुलाई केंद्रे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाहन धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरण्यास मनाई करण्यात आली असून बांधकाम प्रकल्पांनाही पिण्याच्या पाण्याचा वापर करता येणार नाही. उद्याने आणि बांधकामांसाठी शुद्ध केलेले सांडपाणी वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच खासगी आणि व्यावसायिक जलतरण तलावांवर निर्बंध घालण्यात येणार आहेत. विहिरी आणि कूपनलिकांचे सर्वेक्षण करून पर्यायी जलस्रोतांचा वापर वाढविण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.
सध्या खडकवासला धरणात 0.84 टीएमसी (42.33 टक्के), पानशेतमध्ये 2.27 टीएमसी (21.36 टक्के), वरसगावमध्ये 1.90 टीएमसी (14.82 टक्के) तर टेमघर धरणात पाणीसाठा शून्य आहे. चारही धरणांतील एकूण साठा 5.01 टीएमसी म्हणजेच 17.19 टक्के इतकाच राहिला आहे.
दरम्यान, अनुकूल हवामानामुळे मान्सूनने सोमवारी रत्नागिरी जिल्ह्याचा आणखी काही भाग व्यापत मध्य महाराष्ट्रातील सोलापूरपर्यंत प्रगती केली आहे. पुढील 2 ते 3 दिवसांत राज्यातील आणखी काही भागांत मान्सून पोहोचण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मात्र पुणेकरांना अद्याप मान्सूनपूर्व पावसाची प्रतीक्षा असून पुढील दोन दिवस दुपारनंतर आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.







