पुणे: पुण्यातील गणेश पेठ, भवानी पेठ आणि नाना पेठ परिसरात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी धडक कारवाई करत संशयित अन्नपदार्थांचा तब्बल ४५ लाख ५० हजार रुपयांचा साठा जप्त केला आहे. निकृष्ट दर्जाचे पदार्थ विक्रीसाठी ठेवणे, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणे आणि आवश्यक कागदपत्रांचा अभाव अशा विविध कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या सर्व अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

एफडीएच्या पथकाने गणेश पेठेतील वर्धमान एंटरप्रायझेसमध्ये तपासणी केली असता अन्नामलाई मिठाई, इमली जेली आणि लव्हली कँडी असा सुमारे ७ लाख ८२ हजार रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला. या उत्पादनांवरील लेबलिंगमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या असून, ग्राहकांना आवश्यक माहिती देण्यात आलेली नव्हती. त्याच परिसरातील न्यू पांडियन एंटरप्रायझेसमधून सोनपापडी, चिक्की आणि रसमलाई बर्फी असा जवळपास ५९ हजार रुपयांचा मालही जप्त करण्यात आला.

भवानी पेठेतील गुरुनानक हायस्कूलजवळ असलेल्या माणिक सोहनलाल परमार यांच्या गोदामावर झालेल्या कारवाईत सर्वाधिक साठा आढळून आला. सेंटर फिल्ड कँडी आणि चॉकलेट वेफर रोल असा तब्बल ३६ लाख ३९ हजार रुपयांहून अधिक किमतीचा माल जप्त करण्यात आला. तपासणीदरम्यान संबंधित गोदामाकडे अन्न व्यवसायासाठी आवश्यक परवाना किंवा नोंदणी नसल्याचेही स्पष्ट झाले.
नाना पेठेतील गोयल सेल्स कॉर्पोरेशनमधून काजू, बदाम, मनुका, मटण मसाला आणि मोहरी असा सुमारे ७० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. या उत्पादनांमध्ये चुकीच्या ब्रँडिंगचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच विजय लक्ष्मी ट्रेडर्स येथून राईस ‘०’ नंबर शेव आणि फरसाणही जप्त करण्यात आले असून त्याचीही तपासणी सुरू आहे.
दरम्यान, सातारा आणि सांगली जिल्ह्यांमध्येही एफडीएने अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलली आहेत. साताऱ्यातील न्यू सम्राट हॉटेल, हॉटेल केशर आणि हॉटेल लक्ष्मी गार्डन फॅमिली रेस्टॉरंट तसेच सांगलीतील मैत्री चायनीज सेंटर आणि हॉटेल ‘२५२० गावरान तडका’ या पाच आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
याशिवाय सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात कृत्रिम दूध तयार करण्याचा प्रकारही उघडकीस आला. या कारवाईत पाच लिटर म्हशीचे दूध आणि भेसळीसाठी वापरले जाणारे सुमारे ४.४ किलो रिफाइंड पाम ऑइल जप्त करण्यात आले. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधातील अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.






