पुणे: आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. भुसावळ, नागपूर, नवी अमरावती आणि खामगाव येथून पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांसाठी एकूण 16 विशेष रेल्वे फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या निर्णयामुळे खान्देश आणि विदर्भातील वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ-पंढरपूर मार्गावर अनारक्षित विशेष रेल्वेच्या चार फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक 01159 ही 24 आणि 25 जुलै रोजी दुपारी 1.30 वाजता भुसावळहून पंढरपूरसाठी रवाना होईल. तर परतीची गाडी क्रमांक 01160 ही 25 आणि 26 जुलै रोजी रात्री 10.30 वाजता पंढरपूरहून सुटेल. या गाड्यांना जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

नागपूर-मिरज विशेष गाडी क्रमांक 01205 ही 23 आणि 24 जुलै रोजी सकाळी 8.50 वाजता नागपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 11.55 वाजता मिरज येथे पोहोचणार आहे. परतीची गाडी क्रमांक 01206 ही 24 आणि 25 जुलै रोजी दुपारी 12.55 वाजता मिरजहून सुटून पुढील दिवशी नागपूरला पोहोचेल.
नवी अमरावती-पंढरपूर विशेष गाडी क्रमांक 01119 ही 21 आणि 24 जुलै रोजी दुपारी 2.40 वाजता नवी अमरावतीहून सुटणार आहे. तर परतीची गाडी क्रमांक 01120 ही 22 आणि 25 जुलै रोजी संध्याकाळी 7.30 वाजता पंढरपूरहून रवाना होईल.
याशिवाय खामगाव-पंढरपूर विशेष गाडी क्रमांक 01121 ही 21 आणि 23 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता खामगावहून सुटेल. परतीची गाडी क्रमांक 01122 ही 22 आणि 24 जुलै रोजी पहाटे 5 वाजता पंढरपूरहून रवाना होणार आहे.
आषाढी वारीसाठी मोठ्या संख्येने भाविक पंढरपूरला जात असल्याने या विशेष रेल्वे सेवेमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होईल आणि रेल्वेवरील अतिरिक्त गर्दीचे नियोजन करण्यासही मदत होणार आहे.







