पुणे: भर उन्हाळा सुरू होण्याच्या तोंडावर पुणे शहरावर (Pune Water Cut) पाणीटंचाईचे गंभीर संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खडकवासला धरण प्रकल्पाची तब्बल 948 कोटी रुपयांची पाणीपट्टी थकीत असल्याने जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला कडक इशारा दिला आहे. येत्या 23 मार्चपर्यंत थकीत रक्कम जमा न केल्यास 24 मार्चपासून पुण्याचा पाणीपुरवठा थांबवण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आल्याने महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

या वादाचे मूळ कारण पाणी वापराच्या प्रमाणाशी संबंधित आहे. जलसंपदा विभागाच्या म्हणण्यानुसार, पुणे शहरासाठी खडकवासला प्रकल्पातून दरवर्षी 11.60 टीएमसी पाणी वापरण्याची परवानगी आहे. मात्र प्रत्यक्षात महापालिका दरवर्षी सुमारे 8 ते 9 टीएमसी अतिरिक्त पाणी वापरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अतिरिक्त पाण्यासाठी दंडासह दरवर्षी सुमारे 300 कोटी रुपये भरावे लागतात. मात्र चालू आर्थिक वर्षात महापालिकेने केवळ 97 कोटी रुपये भरल्यामुळे थकबाकीची रक्कम मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या मुद्द्यावर महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी महापालिकेचेच सुमारे 411 कोटी रुपये जलसंपदा विभागाकडे अतिरिक्त जमा असल्याचा दावा केला आहे. मात्र जलसंपदा विभागाने हा दावा फेटाळून लावत आधी थकीत रक्कम भरण्याची मागणी केली आहे.
याशिवाय शहरातून निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचाही मुद्दा पुढे आला आहे. दरवर्षी सुमारे 13 टीएमसी सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते नदीपात्रात सोडले जात असल्याचा आरोप जलसंपदा विभागाने केला आहे. त्यामुळे महापालिकेवर अतिरिक्त दंडही आकारला जात आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत महापालिकेने 1.24 टीएमसी अतिरिक्त पाणी वापरल्याचेही समोर आले आहे.
दोन्ही विभागांतील हा वाद लवकर सुटला नाही तर उन्हाळ्याच्या तोंडावर पुणेकरांना पाणीटंचाईचा मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत या प्रश्नावर तोडगा निघतो का, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.







