
Pune News : लोणी काळभोर, ता. 2 : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील मुळा–मुठा नदीपात्रात लागलेली आग मागील चार दिवसांपासून धुमसत आहे. आग विझविण्यासाठी एमआयटी प्रशासन व अग्निशामक दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असले तरी ती पूर्णपणे शमलेली नाही. विषारी धुराचे लोट परिसरात पसरत असून नागरिक व विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे. एमआयटी शैक्षणिक संकुलातील 70 हून अधिक कर्मचारी अद्याप घटनास्थळी आग नियंत्रणासाठी कार्यरत आहेत. मात्र, लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींकडे कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध नसल्याने कचरा नदीपात्रात टाकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (ता. 2 मार्च) उघडकीस आला आहे. त्यामुळे आग पुन्हा भडकण्याची शक्यता कायम असून परिसरात रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
लोणी काळभोर येथील मुळा-मुठा नदीपात्रात साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला गुरुवारी (ता. 26 फेब्रुवारी) सकाळी साडेनऊच्या सुमारास आग लागली. सुरुवातीला ‘लहानशी घटना’ म्हणून दुर्लक्ष करण्यात आले; मात्र दिवसेंदिवस धूर वाढत गेला आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. चार दिवस उलटूनही आग पूर्णपणे विझलेली नसून आतून धुमसत राहिल्याने विषारी वायूचे लोट परिसरात पसरत आहेत. प्लास्टिक, रबर, वैद्यकीय व इतर मिश्र कचऱ्यामुळे निघणारा काळा, दाट धूर नागरिकांच्या फुफ्फुसात जात आहे.
एमआयटी प्रशासन व अग्निशामक दलाचे कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सुमारे 70 हून अधिक कर्मचारी घटनास्थळी कार्यरत असले तरी मूळ प्रश्न कायम आहे. नदीपात्रात एवढा कचरा साठलाच कसा आणि तो जाळण्याची वेळच का आली? आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असताना धुरामुळे एमआयटी विश्वशांती गुरुकुलमधील पाच विद्यार्थ्यांना श्वास घेण्यास त्रास होऊन रुग्णालयात दाखल करावे लागले. सुदैवाने त्यांना डिस्चार्ज मिळाला; मात्र हजारो विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर निर्माण झालेल्या संकटाची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
परिस्थिती इतकी गंभीर झाली की शनिवारी सुमारे 20 हजार विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करावी लागली. परिसरातील काही उद्योगसंस्थांनाही कामकाज बंद ठेवावे लागले. लोणी काळभोर व कदमवाकवस्ती परिसरातील अनेक नागरिकांना डोळ्यांची जळजळ, घसा बसणे, श्वासोच्छ्वासाचा त्रास आणि चक्कर येणे अशी लक्षणे जाणवत असल्याचे सांगितले जात आहे. वृद्ध, लहान मुले आणि आजारी नागरिकांसाठी हा धूर जीवघेणा ठरू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.
देशपातळीवर स्वच्छतेच्या घोषणा दिल्या जातात; मात्र प्रत्यक्षात नदीपात्रात कचरा टाकला जात असल्याचे चित्र समोर येत आहे. ही बाब संतापजनक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
दरम्यान, लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींकडे कचरा व्यवस्थापनासाठी अधिकृत जागा उपलब्ध नसल्याने कचरा अजूनही थेट नदीपात्रात टाकला जात आहे. या नदीपात्रातील कचऱ्याला यापूर्वीही वारंवार आग लागण्याचे प्रकार घडले आहेत. ही आग नैसर्गिक कारणांनी लागते की हेतुपुरस्सर लावली जाते, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असेल तर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
“मुळा–मुठा नदीपात्र परिसरात मागील 24 तासांपासून फिरते हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्र कार्यरत असून वातावरणातील हवेची सातत्याने पडताळणी केली जात आहे. या प्रकरणाबाबत गटविकास अधिकारी तसेच स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागविण्यात आला आहे. लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.”
— नवनाथ औताडे, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे“नदीपात्रातील कचरा जळत असून त्यातून निर्माण होणारा धूर नागरी वस्तीत पसरत आहे. या धुरामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि आधीपासून आजार असलेल्या रुग्णांना त्रास होऊ शकतो. विशेषतः मधुमेह, क्षयरोग (टीबी) व हृदयरोग असलेल्या रुग्णांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. दूषित हवेमुळे संसर्गजन्य आजार तसेच त्वचारोग वाढू शकतात. नागरिकांनी शक्यतो मास्कचा वापर करावा. श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांची जळजळ, खोकला किंवा इतर लक्षणे जाणवल्यास त्वरित दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावेत.”
— डॉ. महबूब लुकडे, आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, लोणी काळभोर (ता. हवेली)






