पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा समाधानकारक असल्याने सध्या तरी शहरात पाणीकपात लागू करण्यात येणार नाही. त्यामुळे नागरिकांना पुढील काही दिवस नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा सुरू राहणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नव्हता. त्यामुळे धरणांतील पाणीसाठा आणि संभाव्य पाणीकपातीबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. सध्या धरणांमध्ये सुमारे १६.६४ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून तो समाधानकारक असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने ७ ते १२ जुलैदरम्यान लागू असलेली पाणीकपात तात्पुरती स्थगित केली होती. ही मुदत रविवारी संपत असल्याने सोमवारपासून पुन्हा दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होणार का, असा प्रश्न पुणेकरांना पडला होता. मात्र, सध्याची पाणीस्थिती लक्षात घेता महापालिकेने तातडीने पाणीकपात लागू न करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा आणि पुढील काही दिवसांचा पावसाचा अंदाज याचा सविस्तर आढावा घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
यासाठी पुढील आठवड्यात सर्वपक्षीय नेते, प्रशासन आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत धरणांतील पाणीसाठा, शहराची दैनंदिन पाण्याची गरज आणि आगामी पावसाची परिस्थिती यांचा विचार करून दिवसाआड पाणीपुरवठा करायचा की नियमित पुरवठा कायम ठेवायचा, याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
तोपर्यंत पुणेकरांना दररोज नियमित पाणीपुरवठा मिळणार असल्याने शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.







