पुणे: पुण्यातील नवले पुलावर 13 नोव्हेंबर (Navale Bridge Accident) रोजी झालेल्या भीषण (Pune News) अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आणि 15 जण जखमी झाले. ताबा सुटलेल्या एका कंटेनरने 12 ते 15 वाहनांना धडक दिल्यानंतर कार आणि कंटेनरला आग लागली. या अपघातांमुळे नवले पुलावरील सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसह विरोधी पक्षातील नेत्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचा निषेध केला आणि रस्ता सुरक्षा समितीने याबाबत बैठक घेतली.

या प्रकरणाची तपासणी करताना आरटीओने प्राथमिक अहवाल सादर केला असून अपघाताचे मुख्य कारण अतिवेग असल्याचे नमूद केले आहे. कंटेनरचा वेग खूप जास्त होता आणि चालकाने वाहन न्यूट्रलमध्ये टाकले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे उतारावर नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असे आरटीओने म्हटले आहे. आरटीओचा अंतिम अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे.
या दुर्घटनेनंतर पुणे-सातारा महामार्गावर अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आरटीओ विभागाने दोन भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. एका पथकाकडून वाहनांची तपासणी, तसेच चालकाने मद्यप्राशन केले आहे का याची पाहणी केली जाईल. दुसरे पथक मालवाहू आणि जड वाहने चालवणाऱ्या चालकांचे समुपदेशन करणार आहे. पुढे उतार आहे, वाहन न्यूट्रलवर चालवू नका, वेग कमी ठेवा अशा सूचना चालकांना दिल्या जाणार आहेत. ही पथके खेड-शिवापूर टोलनाक्याजवळ तैनात राहणार आहेत. अपघात कमी करण्यासाठी ही मोहीम सतत सुरू ठेवण्याचे आरटीओने सांगितले आहे.







