पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्क आणि पुण्याच्या मध्यवर्ती भागाला जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मेट्रो मार्गिका क्रमांक 3 च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण 15 जुलै रोजी होण्याची शक्यता असून, त्यामुळे दररोज हिंजवडीकडे प्रवास करणाऱ्या हजारो आयटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त अभिजित चौधरी यांनी याबाबत माहिती दिली. पहिल्या टप्प्यात माण ते रामनगर बाणेर दरम्यानची 12 मेट्रो स्थानके प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार आहेत. या टप्प्यामुळे हिंजवडी आणि बाणेर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मेट्रो सेवा सुरू करण्यापूर्वी आवश्यक सुरक्षा आणि तांत्रिक चाचण्या पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यानुसार 15 ते 20 जून या कालावधीत मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (सीएमआरएस) प्रत्यक्ष पाहणी आणि तपासणी केली जाणार आहे. सुरक्षा मान्यता मिळाल्यानंतरच मेट्रो सेवा प्रवाशांसाठी सुरू केली जाईल.
दरम्यान, प्रकल्पाचे काम करणाऱ्या ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड’ला 30 जूनपर्यंत सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर पावसाळी परिस्थिती आणि तांत्रिक बाबींचा आढावा घेऊन 15 जुलैपासून सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
प्रकल्पाचा उर्वरित भागही टप्प्याटप्प्याने पूर्ण केला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात हाय स्ट्रीट बाणेर ते शिवाजीनगर दरम्यानची 11 स्थानके डिसेंबर 2026 पर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानंतर संपूर्ण मेट्रो मार्गिका पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे. तसेच स्थानकांशी संबंधित सुशोभीकरण आणि इतर पूरक कामे मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
हिंजवडी आयटी पार्क हे देशातील प्रमुख माहिती-तंत्रज्ञान केंद्रांपैकी एक मानले जाते. येथे दररोज हजारो कर्मचारी कामासाठी ये-जा करतात. त्यामुळे मेट्रोचा पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होण्यास, प्रवासाचा वेळ वाचण्यास आणि सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळण्यास मोठी मदत होणार आहे.







