पुणे: आळंदी येथून दरवर्षी निघणाऱ्या संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या वेळापत्रकाबाबत यंदा अनिश्चितता निर्माण झाली आहे. वारकऱ्यांमध्ये या वेळापत्रकाची मोठी उत्सुकता असतानाच ते जाहीर होण्यास उशीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मुळात हे वेळापत्रक 13 एप्रिल रोजी जाहीर होणार होते. मात्र काही नियोजनाशी संबंधित अडचणींमुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील भवानी पेठेतील विठ्ठल मंदिरात 9 आणि 10 जुलै रोजी पालखीचा मुक्काम होणार आहे. मात्र त्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा आणि व्यवस्थेबाबत अद्याप स्पष्ट आणि लेखी प्रस्ताव प्राप्त झालेला नाही.
वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांची खात्री देता येत नसल्याने वेळापत्रक जाहीर करण्यास संस्थानने सध्या स्थगिती दिली आहे. या संदर्भात मंदिर प्रशासनाला काही सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र 12 एप्रिलपर्यंत त्यावर कोणतेही ठोस उत्तर मिळाले नसल्याने हा निर्णय पुढे ढकलावा लागल्याचे संस्थानकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी लवकरच एक महत्त्वाची बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, मंदिर प्रशासन, दिंडी प्रमुख आणि संस्थानचे सदस्य सहभागी होणार आहेत. पुढील 8 दिवसांत ही बैठक पार पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
यानंतर अंतिम निर्णय 26 एप्रिल रोजी पंढरपूर येथे होणाऱ्या बैठकीत वारकरी समाजासमोर मांडला जाणार आहे. सर्व बाबींचा विचार करून 1 मे रोजी आळंदी येथे पालखी सोहळ्याचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले जाईल, अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.







