पुणे, ता.18 : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर, आता राजकीय चर्चा ‘प्रचार’ कडून ‘प्रशासन’ आणि ‘जनमत’ (Narrative) टिकवण्याकडे वळली आहे. याच पार्श्वभूमीवर, राजकीय विश्लेषक आणि रणनीतीकार मल्हार पांडे यांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रॅटिक लीडरशिप’ (IIDL) मध्ये “डिजिटल स्ट्रॅटेजी आणि नरेटिव्ह” या विषयावर विशेष कार्यशाळा शनिवारी (ता.17) घेतली.

या कार्यशाळेत IIDL च्या ‘राजकारण आणि नेतृत्व’ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. डिजिटल युगात देशाची आणि राज्याची बाजू भक्कमपणे कशी मांडावी, तसेच सोशल मीडियावरील खोट्या प्रचाराला (Fake Narratives) तांत्रिक भाषेत आणि पुराव्यासहित कसे उत्तर द्यावे, यावर श्री. पांडे यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेबद्दल बोलताना मल्हार पांडे म्हणाले, “महाराष्ट्राच्या निकालांनी हे सिद्ध केले आहे की जनता विकासाच्या बाजूने आहे. पण हा विश्वास टिकवण्यासाठी ‘डिजिटल संवाद’ महत्त्वाचा आहे. आदरणीय डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या दूरदृष्टीतून साकारलेली IIDL ही संस्था भारताचे भविष्यातील नेतृत्व घडवत आहे. येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांची समज आणि ऊर्जा पाहून मलाही खूप काही शिकायला मिळाले. हे केवळ विद्यार्थी नसून भारताचे भविष्यातील ‘बौद्धिक योद्धे’ आहेत.”
दरम्यान, या सत्रात ‘डिजिटल क्रायसिस मॅनेजमेंट’ (संकटकालीन संवाद) आणि ‘अल्गोरिदम’चा वापर यावर सखोल चर्चा झाली. केवळ राजकीय कार्यकर्ते न राहता, अभ्यासू आणि तंत्रस्नेही नेतृत्व तयार करण्यावर या कार्यशाळेचा भर होता.







