संदीप बोडके

पुणे, ता. 16 : पुण्यात एकापाठोपाठ जैन बोर्डिंग घोटाळा, मुंढवा येथील महार वतन जमीन घोटाळा, धानोरी येथील सहारा समूह घोटाळा असे हजारो कोटींचे तीन मोठे घोटाळे उघड झाले असतानाच, आता हडपसर परिसरात मोक्याच्या ठिकाणी असलेली शेकडो एकर शेतजमिनींच्या घोटाळ्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे. यामध्ये सुद्धा भोगवटादार वर्ग दोनची जमीन व सरकारी जमीन एका बिल्डरने शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून गिळंकृत केली आहे. असा आरोप क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल यशवंत तुपे यांनी केला असून त्यांनी याबाबतची लेखी तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
अमोल तुपे यांनी दिलेल्या तक्रारी अर्जात असे म्हटले आहे की, सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड आणि त्यांच्या संचालकांनी शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या संमतीशिवाय खरेदी करून घेतल्या. यातील काही जमिनी मालकांच्या परवानगीशिवाय व्यवहारात समाविष्ट करून शासनाचा करोडो रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडविला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या सातबारामध्ये हेराफेरी करण्यात आली आहे. कंपनीने बनावट कागदपत्रे, साठेखत आणि कुलमुखत्यारपत्रांचा वापर करून व्यवहार केला आहे. हा जमीन घोटाळा दोन हजार कोटीहून अधिक रुपयांचा आहे. या प्रकरणातील गैरव्यवहार 2004 पासून सुरू आहे. असा गंभीर आरोप अमोल तुपे यांनी सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड आणि त्यांच्या संचालकांवर केला आहे.
अमोल तुपे या तक्रारीची प्रत जिल्हाधिकारी पुणे, विभागीय आयुक्त, नगररचना विभाग, पुणे महापालिका, पीएमआरडीए आणि नोंदणी व मुद्रांक विभागाला पाठवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी पुणे यांनी मार्च 2025 मध्ये चौकशीचे आदेश दिल्यानंतर तहसीलदार हवेली आणि हडपसर मंडळाच्या अहवालात सिटी कॉर्पोरेशनने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. संगणकीय 7/12 उताऱ्यांमध्ये तफावत असल्याचेही आढळले. महसूल विभागाला या प्रकरणात अनेक अनियमितता आढळल्या आहेत.
दरम्यान, शेतकऱ्यांनी अमनोरा टाऊनशिपसाठी दिलेले एकत्रीकरण रद्द करण्याची, लेटर ऑफ इंटेंट रद्द करण्याची आणि शासनाने दिलेले अतिरिक्त फायदे रद्द करून जमिनी मूळ मालकांना परत देण्यात यावी. गैरव्यवहारात सहभागी असलेल्या व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करून मोठ्या प्रमाणातील बुडविलेल्या महसूल शुल्काची वसुली करावी. अशी मागणी अमोल तुपे यांनी केली आहे.
पुण्यात नेमकं चाललंय तरी काय?
पुण्यात एकापाठोपाठ अनेक जमिनीचे घोटाळे समोर येऊ लागले आहेत. यामध्ये राजकीय नेते, बिल्डर व अधिकाऱ्यांची साखळी असल्याचे दिसून येत आहेत. यामध्ये जमिनीच्या मूळ मालकांना अंधारात ठेवण्यात आले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या जमिनी हडप करून बिल्डर मालामाल झाले आहेत. हडपसरमधील वादग्रस्त जमिनींच्या व्यवहारामुळे अब्जावधी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे घोटाळे करणाऱ्यांवर कायद्याच्या वचक बसावा. म्हणून प्रशासनाने या प्रकरणांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल यशवंत तुपे व आमची कोर्टात एक केस चालू आहे. या खटल्यात त्यांना आमच्याकडून जे शक्य नाहीत अशा गोष्टी हव्या आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो आम्हाला तुमची बदनामी करू असे म्हणून अप्रत्यक्ष धमकावीत आहे. त्यांने सरकारकडे गेल्या तीन महिन्यापूर्वी तक्रारी केल्या आहेत. त्याचे आम्ही निरसन केले आहे. आमची बदनामी करून स्वत:चा फायदा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. याबाबतची कोणालाही कुठलेही स्पष्टता हवी असल्यास आम्ही सोमवारी कार्यालय उघडल्यानंतर पुराव्यानिशी देऊ.
-अनिरुद्ध देशपांडे (संचालक : सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड)







