पिंपरी: पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकेने (PCMC) शहरातील पाणी व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि पाणी चोरी थांबवण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. अनधिकृत नळजोडणीला पाणी मीटर बसवण्याच्या या मोहिमेला विरोध करणाऱ्या माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि झोपडपट्टीतील दादा मंडळींवर आता थेट पोलिसांत पाणीचोरीचा गुन्हा दाखल करण्याचा कठोर निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

शहराची लोकसंख्या वाढत असताना आणि पाणीसाठा मर्यादित असताना, पाण्याचे अचूक नियोजन करणे आवश्यक आहे. शहरात 30 हजारांपेक्षा अधिक अनधिकृत नळजोड असल्याचा महापालिकेचा अंदाज आहे. या बेहिशोबी पाण्यामुळे महापालिकेचे मोठे नुकसान होत असून, 30 टक्के पाण्याची चोरी होत असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.

पाणीचोरी व गळती रोखण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने सर्व प्रकारच्या नळजोडण्यांवर पाणी मीटर बसवण्याची मोहीम सुरू केली आहे. आत्तापर्यंत 2 हजार 500 अनधिकृत नळजोडणींना पाणी मीटर बसवण्यात आले आहेत. मीटर आणि नळजोडणीचा खर्च घरगुती वापरकर्त्यांकडून पाणीबिलातून हप्त्याने वसूल केला जात आहे.
मीटरमुळे पाण्याचा वापर अचूकपणे मोजला जाईल आणि अपव्यय टाळता येईल. त्यामुळे नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करून पाणी व्यवस्थापनात मदत करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.







