Maharashtra Farmer News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारचा निर्णय जवळपास अंतिम टप्प्यात असून, 30 जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर केली जाईल, असा स्पष्ट दावा कृषीमंत्री दत्तात्र्य भरणे यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी याबाबत आधीच धोरणात्मक निर्णय घेतला असून, सध्या त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक माहिती संकलनाचे काम सुरू आहे.

भरणे यांनी सांगितले की, परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली समिती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आपला अहवाल सादर करणार आहे. या अहवालाच्या आधारे अंतिम निर्णय घेतला जाईल. एप्रिलपूर्वी संपूर्ण माहिती सरकारकडे उपलब्ध होईल, त्यामुळे कर्जमाफीची प्रक्रिया वेळेत पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही भरणे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ‘सुनेत्रा पवार यांनी पक्षाची जबाबदारी घ्यावी, अशी आमदारांची भावना असली तरी पवार कुटुंब सध्या दुःखात आहे. तेराव्या दिवसानंतरच सर्व वरिष्ठ नेते आणि आमदार एकत्र बसून निर्णय घेतील,’ असे त्यांनी स्पष्ट केले. बारामती येथे सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याचे सांगत, ही भेट पूर्णपणे भावनिक असून कोणतीही राजकीय चर्चा झालेली नसल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.
कर्जमाफीबाबत बोलताना भरणे म्हणाले की, आगामी अर्थसंकल्पात मर्यादित तरतूद असू शकते, मात्र सरकारने दिलेला शब्द नक्की पाळला जाईल. अजित पवार यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी मोठी असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे नेतृत्व म्हणून योग्य निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्थानिक राजकारणावर भाष्य करताना भरणे यांनी इंदापूरची जनता विकासाला महत्त्व देणारी असून, केवळ भाषणांना भुलत नाही, असा दावा केला. ‘तालुक्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावरील सर्व उमेदवार विजयी होतील,’ असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.







