आदित्य बोराटे

Indapur : सध्या सायंकाळी 6 ते 10 या वेळेत सुरू असलेल्या लोडशेडिंगमुळे विद्यार्थ्यांसह शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्या निर्मला सागर मिसाळ यांच्या वतीने ऊर्जा भवन, बारामती येथे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांना निवेदन देत सध्याचे भारनियमन रद्द करून वेळेत बदल करण्याची ठाम मागणी करण्यात आली.
सध्या सायंकाळच्या वेळेत होणाऱ्या वीज खंडितीमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात मोठा अडथळा निर्माण होत आहे. परीक्षा काळात ही समस्या अधिक तीव्र बनत असून शेतकऱ्यांच्या शेतीसंबंधित कामांवरही त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे.
निवेदनात सध्याचे सायंकाळी 6 ते 10 या वेळेतील लोडशेडिंग रद्द करून ते पहाटे 5.30 ते 7.30 किंवा सकाळच्या वेळेत करण्याचा पर्याय सुचविण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या निर्मला सागर मिसाळ यांनी प्रशासनाने जनतेच्या भावना ओळखून तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासन आता काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सागर मिसाळ यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित हा प्रश्न तातडीने सोडवला गेला पाहिजे, अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन उभारले जाईल.”
दरम्यान, सध्या सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅसच्या तुटवड्यामुळे नागरिकांकडून इलेक्ट्रिक शेगडीचा आणि इतर इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्यामुळे वीजेवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. याबाबत मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांनी माहिती दिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते सागर मिसाळ यांनी सांगितले.







